UDAIPUR TAILOR MURDER : उदयपूरमधील टेलरच्या हत्येप्रकरणी आणखी दोघांना अटक | पुढारी

UDAIPUR TAILOR MURDER : उदयपूरमधील टेलरच्या हत्येप्रकरणी आणखी दोघांना अटक

उदयपूर; पुढारी ऑनलाईन : उदयपूर येथे मंगळवारी (दि.२६) करण्यात आलेल्या टेलर कन्हैय्या लाल (UDAIPUR TAILOR MURDER) यांच्या हत्येप्रकरणी आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. कपडे शिवण्याच्या बहाण्याने आलेल्या आरोपी रियाज अख्तरी आणि मोहम्मद गौस यांनी टेलर किशन लाल यांची हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी मोसीन आणि आसिफ या दोघांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यामध्ये मोसीन आणि आसिफ यांनी मुख्य आरोपी मोहम्मद गौस आणि रियाज अख्तरी यांना मदत केली आहे. हत्येचा (UDAIPUR TAILOR MURDER) कट रचणे व त्याची पूर्वतयारी करण्यामध्ये मोसीन आणि आसिफचा सहभाग होता. या प्रकरणी शुक्रवारी या दोघांना न्यायालायत हजर केले असता त्यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. या आधी गुरुवारी मुख्य आरोपी मोहम्मद गौस आणि रियाज अख्तरी यांना उदयपूरच्या सत्र न्यायालयाने १३ जुलैपर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

टेलर किशनलाल यांची हत्या (UDAIPUR TAILOR MURDER)

मंगळवारी २६ जूनरोजी मोहम्मद गौस आणि रियाज अख्तरी हे कपडे शिवण्याच्या बहाण्याने टेलर किशन लाल (UDAIPUR TAILOR MURDER) यांच्या दुकानात गेले होते. तेथे त्यांनी आपल्या कपड्याचे माप दिले. यानंतर किशन लाल हे कामात व्यस्त असल्याचे पाहून मोहम्मद गौस आणि रियाज अख्तरी यांनी धारधार शस्त्राने किशन लाल यांची हत्या केली. तसेच या घटनेचा त्यांनी व्हिडिओ देखील शूट करून समाज माध्यमांवर पोस्ट केला होता.  या हत्येनंतर आरोपी फरार झाले होते.

या घटनेमुळे उदयपूर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या हत्येप्रकरणी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत निदर्शने केली. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आरोपींना तत्काळ पकडून कठोर शिक्षा करु, तसेच संबधित व्हिडिओ शेअर करु नये, असे आवाहन  जनतेला केले होते.

दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी हत्या झालेल्या किशन लाल यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. तसेच यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, राष्ट्रीय तपास एजन्सी (NIA) कडे या गुन्ह्याचा तपास सोपवण्यात आला आहे. एनआयएने लवकरात लवकर आरोपपत्र फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल करावा जेणेकरुन या प्रकरणी पीडितांना त्वरीत न्याय मिळेल.

Back to top button