sugar exports : केंद्राचे साखर निर्यातीवर निर्बंध! १०० लाख टन निर्यातीलाच परवानगी, आदेश जारी
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशांतर्गत सारखरेची उपलब्धता तसेच किंमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारने १०० लाख मेट्रिक टनापर्यंत साखर निर्यातीला (sugar exports) परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. डायरेक्टर ऑफ जनरल फॉरेन ट्रेडने (डीजीएफटी) जारी केलेल्या आदेशानूसार १ जून २०२२ पासून ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अथवा पुढील आदेशापर्यंत साखर संचालनालय,अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या विशिष्ट परवानगीने साखरेच्या निर्यातीला परवानगी दिली जाईल. बुधवारी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करीत यासंबंधी माहिती दिली.
साखर हंगामाच्या शेवटी ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत साखरेचा साठा ६०-६५ एलएमटी राहील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. हा साठा देशांतर्गत वापरासाठी आवश्यक असलेला २-३ महिन्यांचा आहे. नवीन हंगामातील गाळप कर्नाटकात ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि महाराष्ट्रात ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि उत्तर प्रदेशात नोव्हेंबरमध्ये सुरू होते. त्यामुळे साधारणपणे नोव्हेंबरपर्यंत साखरेचा पुरवठा मागील वर्षीच्या साठ्यातून होतो. साखरेच्या निर्यातीत झालेली अभूतपूर्व वाढ आणि देशात साखरेचा पुरेसा साठा राखण्याची गरज लक्षात घेऊन तसेच साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राने साखरेचे निर्यात नियमन करण्याचा निर्णय घेतला आहे.
चालू वर्षात भारत हा जगातील सर्वाधिक साखर उत्पादक आणि दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यात करणारा देश ठरला आहे. २०२०-२१ च्या मागील साखर हंगामातील उसाच्या थकीत रकमेपैकी ९९.५ टक्के रक्कम अदा करण्यात आली आहे आणि चालू साखर हंगाम २०२१-२२ ची सुमारे ८५ टक्के उसाची थकबाकी शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.
गेल्या १२ महिन्यांत साखरेच्या किमती नियंत्रणात आहेत. भारतातील साखरेच्या घाऊक किमती प्रति क्विंटल ३१५०-३५०० रुपयाच्या दरम्यान आहेत तर देशाच्या विविध भागांमध्ये किरकोळ किमती देखील किलोमागे ३६-४४ रुपयांच्या दरम्यान नियंत्रणात असल्याचे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने सांगितले आहे.
साखरेची विक्रमी निर्यात
साखरेच्या विक्रमी निर्यातीच्या (sugar exports) पार्श्वभूमीवर केंद्राने हा निर्णय घेतला आहे. साखर हंगाम २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० मध्ये अनुक्रमे ६.२ एलएमटी, ३८ एलएमटी आणि ५९.६० एलएमटी साखर निर्यात झाली. साखर हंगाम २०२०-२१ मध्ये ६० एलएमटीचे उद्दिष्ट होते. तर सुमारे ७० एलएमटी साखर निर्यात झाली. चालू साखर हंगाम २०२१-२२ मध्ये, सुमारे ९० एलएमटी निर्यातीचे करार झाले आहेत. सुमारे ८२ एलएमटी साखर, कारखान्यांनी निर्यातीसाठी पाठवली आहे आणि जवळपास ७८ एलएमटी साखर निर्यात झाली आहे. चालू साखर हंगाम २०२१-२२ मध्ये साखरेची निर्यात ऐतिहासिकदृष्ट्या उच्चांकी असल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
Safeguarding sugar supply!
A welcome step as Govt. to amend sugar export policy from 1st June, 2022 to ensure adequate domestic availability & stability in sugar prices across the country. pic.twitter.com/PrRakEFLaC
— Piyush Goyal (@PiyushGoyal) May 24, 2022