

पटना : पुढारी ऑनलाईन मुलीशी लग्न करण्यासाठी हुंडा मागण्याएवढी वाईट गोष्ट दुसरी कोणतीही नाही. अरे लग्न झालं तर मूल होईल ना? पुरुषाने पुरुषाीशी लग्न केले तर मुले होतील का? तरुणीशी लग्न झालं तरच मूल होतील. आता लग्नासाठी हुंडा घेतला गेला, तर यापेक्षा मोठा अन्याय कोणता आहे का?, अशा शब्दात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हुंडा प्रथेवर पुन्हा एकदा जाेरदार प्रहार केला. लग्नपत्रीकेत हुंडा घेत नाही असे लिहित असेल तरच ते त्यांच्या लग्नाला उपस्थित राहू, अन्यथा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुलींच्या वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी नितीश म्हणाले की, आमच्या काळात कॉलेजमध्ये मुली नसत. मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवणे ही किती वाईट गाेष्ट होती; पण आज मुली मेडिकल असो की इंजिनीअरिंग क्षेत्रात पुढे जात आहेत. महिला सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. आम्ही दारूबंदी लागू केली. हुंडा प्रथा आणि बालविवाहाविरोधात मोहीम सुरू केली आहे, असेही ते म्हणाले.
नितीश कुमार जाती आधारीत जनगणनेवरून सध्या चर्चेत आहेत. या प्रकरणी नितीश कुमार यांच्या निमंत्रणामुळे त्यांचा मित्रपक्ष भाजपची कोंडी झाली आहे. नितीश यांनी सोमवारी सांगितले की, बहुधा शुक्रवारी बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांनी पत्रकारांना सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणाबाबत दिल्लीस्थित पक्ष नेतृत्वाकडून 'मार्गदर्शन' मागवण्यात आले आहे. तसे पाहता नितीश कुमार यांनी जात जनगणनेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा सापळा रचून आघाडी आणि पक्षातील त्रुटी उघड केल्या आहेत, असे भाजप नेत्यांचे मत आहे.
हे ही वाचलंत का?