नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये इंधन दरात सर्वात कमी वाढ झाली आहे. इंधन दरात झालेली वाढ 80 टक्के नव्हे तर 30 टक्के इतकी आहे. दुसरीकडे मागील काही दशकांपासून लोकांच्या मूळ वेतनात कितीतरी पटीने वाढ झाली असल्याचे सांगत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी शुक्रवारी इंधन दरवाढीचे समर्थन केले. विभिन्न श्रेणीतील लोकांसाठी केंद्र सरकारकडून मोफत योजना राबविल्या जात आहेत, अशी पुष्टीही पुरी यांनी पत्रकारांशी बोलताना जोडली.
कोरोना संकटातून आपण पुरते सावरलेलो नाही, असे सांगून ते पुढे म्हणाले की, सरकार अजुनही 80 कोटी लोकांना खाद्यान्न देत आहे. त्यांचे लसीकरण करीत आहे. तिकडे रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यानच्या युध्दामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे प्रतिबॅरलचे दर 19.56 डॉलर्सनी वाढले आहेत. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवर 32 रुपये इतके उत्पादन शूल्क लावले होते. मात्र दिवाळीपूर्वी हे कर कमी करण्यात आले आणि इंधनाचे दर कमी झाले.
जवळपास प्रत्येक मुद्यावर पंतप्रधान मोदी सहकारी संघवादाच्या भूमिकेने काम करीत आहेत. इंधन क्षेत्रात केंद्राने आपली जबाबदारी पार पाडली असून आता राज्यांनी सुध्दा आपल्या जबाबदारीचे वहन केले पाहिजे. थोडक्यात राज्यांनी व्हॅट कर कमी करुन लोकांना लवकरात लवकर दिलासा पाहिजे.