तर भारत शांततेची बाजू निवडेल, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे लोकसभेत प्रतिपादन
नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : युक्रेन आणि रशिया युध्दाच्या पार्श्वभूमीवर जर बाजू निवडायची वेळ आली तर भारत शांततेची बाजू निवडेल, असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी लोकसभेत या युध्दावरील चर्चेला उत्तर देताना केले.
युक्रेनमधला हिंसाचार तातडीने थांबणे गरजेचे असल्याचे सांगतानाच चर्चा आणि कुटनीतीच्या मार्गाने समस्येवर तोडगा काढला जावा, अशी अपेक्षा जयशंकर यांनी व्यक्त केली.
रक्त सांडून आणि निष्पाप लोकांचे प्राण घेऊन कोणतीही समस्या सुटू शकत नाही, असे सांगून जयशंकर पुढे म्हणाले की, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची आणि विशेषतः विद्यार्थ्यांना वेळीच सुटका करण्यात भारताला यश आले. इतक्या मोठ्या प्रमाणावर सुटकेची मोहिम इतर कोणत्याही देशाने हाती घेतलेली नव्हती.
सुटकेची मोहिम म्हणजे राजकीय अजेंडा असल्याचा कांगावा काही पाश्चिमात्य देशांनी केला. मात्र ऑपरेशन गंगाचे उद्दिष्ट राजकीय नव्हे तर भारतीयांची सुटका करणे हेच होते. युक्रेनमधील बुचा येथे निष्पाप लोकांच्या झालेल्या हत्याकांडाचा आपण तीव्र निषेध करतो. या हत्याकांडाची निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे. युध्द संपण्यासाठी भारताने रशिया आणि युक्रेन या देशांना चर्चेचा आग्रह केलेला आहे.
हे ही वाचलं का ?