संजय राऊत : ‘शरद पवारांशिवाय मोदींविरोधात पर्याय निर्माण होऊ शकत नाही’ | पुढारी

संजय राऊत : 'शरद पवारांशिवाय मोदींविरोधात पर्याय निर्माण होऊ शकत नाही'

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : शरद पवारांशिवाय मोदींविरोधात पर्याय निर्माण होऊ शकत नाही, असे सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (सोमवार) केले. पवार खूप मोठे नेते आहेत. सगळेच त्यांचा आदर करतात, सन्मान करतात. देशातल्या विरोधी पक्षाला एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे. विरोधी, समविचारी पक्ष एकत्र यावेत यासाठी नक्कीच काही भूमिका ठरत आहेत. अशात शरद पवार यांच्या सक्रिय सहभागाशिवाय या एकजुटीचे पाऊल पुढे जाणार नाही, सर्वांना माहिती आहे, असे देखील राऊत यांनी स्पष्ट केले.

पवारांचे मार्गदर्शन याबाबतीत नेहमी लाभत असते. त्यांच्या मनात काय आहे, हे आम्ही समजून घेऊ. शरद पवारांशिवाय मोदींना पर्याय किंवा विरोधी पक्षाची एकजूट होऊ शकत नाही. विरोधकांच्या एकजुटीचे नेतृत्व करण्यासाठी देशात अनेक सक्षम प्रमुख नेते आहेत. पंरतु, या आघाडीचे नेतृत्व करण्यात शरद पवारांनी पुढे यावे, असे सर्वांना वाटत असल्याचे मत राऊत यांनी व्यक्त केले.

संजय राऊत पुढे म्हणाले की, शिवसेनेमध्ये निर्णय घेण्याची उत्तम क्षमता आहे. शिवसेनेला, मुख्यमंत्र्यांना राज्यातल्या लोकांचा पाठिंबा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सतत तीन वेळा देशातल्या पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांच्या टॉप लिस्टमध्ये आलेले आहेत. हे जर कुणाला कळत नसेल, तर त्यांचा नंबर राजकारणात ‘ढ’ पेक्षाही खाली मानावा लागेल. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या लोकांच्या दृष्टीने शिवसेना ही मेरीट लिस्ट मध्ये आलेली आहे. आता कोणाला काय बोलायचा हा त्यांचा प्रश्न, अश्या शब्दात त्यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

कोल्हापूर उत्तरमध्ये जर पैसे घेऊन मतदान केले तर मतदारांच्या मागे ईडी लागेल असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. यावर प्रत्युत्तर देतांना राऊत म्हणाले की, कोल्हापूर उत्तरच कशाला? गोव्यात पणजी आणि साखळी मतदारसंघातील मतदारांच्या मागे ईडी लावा. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालच्या काही मतदारसंघात ईडी लावणे गरजेचे आहे. उत्पल पर्रिकरांचा पराभव झाला. साखळी मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघात ईडी चौकशी लावली तर त्याचे स्वागत करू. महाराष्ट्राचे नंतर बघू. परंतु, सुरुवात या पाच राज्यात करा. मतदारांवर अनेक माध्यमातून झालेला प्रभाव याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे राऊत म्हणाले.

Back to top button