पुढारी ऑनलाईन डेस्क
भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा केला जात आहे. या उपक्रमांतर्गत परराष्ट्र मंत्रालयाने इंटर्नशिप प्रोग्राम (MEA Internship Programme 2022-23) सुरु केला आहे. यासाठी ७५ उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
परराष्ट्र धोरण लोकांपर्यंत नेणे तसेच एमईएवर अधिक लक्ष केंद्रीय करण्याचा एमईए इंटर्नशिप पॉलिसीचा (MEA Internship Policy) उद्देश आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान पदवीधर असलेले भारतीय नागरिक MEA मध्ये इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. पदवीच्या अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थीदेखील अर्ज करु शकतात. त्यासाठी त्यांच्या अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमात इंटर्नशिप अनिवार्य असायला हवे. उमेदवाराचे वय इंटर्नशिप वर्षात ३१ डिसेंबर रोजी २५ वर्षांहून जास्त नसावे. २०२२ मध्ये एप्रिल-जून दरम्यान तीन महिन्यांसाठी ७५ उमेदवारांना इंटर्नशीपची संधी मिळणार आहे.
अर्ज, छाननी, निवड, विभाग वाटप, नोटिफिकेशन, मुदतवाढ, प्रमाणपत्र आदी निवड प्रक्रिया www.internship.mea.gov.in यावर ऑनलाइन होईल. त्यासाठी प्रत्येक उमेदवाराला यासाठी इंटर्नशिप पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावे लागेल.
प्रत्येक इंटर्नला प्रति महिना १० हजार मानधन मिळेल. उमेदवार ज्या राज्याचा आहे तेथून दिल्ली पर्यंत ये-जा करण्याचा एकावेळचा इकॉनॉमी क्लासचा हवाई प्रवास खर्च मिळणार आहे. इंटर्नशिप दरम्यान दिल्लीत राहण्याचा आणि खाण्यापिण्याचा खर्च स्वतःला करावा लागणार आहे.
निवड प्रक्रिया दोन टप्प्यांत होईल. प्राथमिक स्क्रीनिंग और वैयक्तिक मुलाखत होईल. निवड प्रक्रियवेळी २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांतील उमेदवारांचा विचार केला जाणार आहे. २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांतून २-२ इंटर्नची निवड होणार आहे.
इंटर्नशिपमध्ये ३० टक्के महिला उमेदवार असतील. राज्यनिहाय मेरिट लिस्ट जारी केली जाणार आहे. प्रेलिमिनेरी स्क्रीनिंग दरम्यान टीएडीपी जिल्ह्यातील उमेदवार आणि वैयक्तिक मुलाखतीवेळी एससी/एसटी/ओबीसी/ईडब्ल्यूएस कॅटेगरीजमधील उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. मेरिट लिस्टमधून निवड झालेल्या उमेदवारांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुलाखतीसाठी संपर्क केला जाणार आहे.
इंटर्नशिप दरम्यान, उमेदवारांना मंत्रालयाचे कामकाज, त्याच्याशी संलग्न कार्यालये आणि विदेशातील भारतीय नागरिकांना मदत करण्याच्या भूमिकेच्या विविध पैलूंबद्दल माहिती दिली जाणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.