नागपूर, पुढारी वृत्तसेवा : संभाजी भिडे यांचे महापुरुषांबद्दलचे विधान नेहमीच अवमानकारक असतात. आता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत भिडे यांनी वादग्रस्त विधान केले आहे. यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला भिडे यांच्या वक्तव्यांवरुन घेरले आहे. भाजपला भिडेंच्या माध्यमातून महाराष्ट्र पेटवायचा आहे का? असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. संभाजी भिडे यांना तातडीने अटक करा, अशी मागणीही पटोले यांनी विधानसभेत केली आहे.
सावित्रीबाई फुलेंबद्दल अवमानकारक लिहिणाऱ्याला जाहीर फाशी देण्याचे वक्तव्य फडणवीस यांनी केले. आता फडणवीस भिडे यांना फाशी देणार का? असाही सवाल माध्यमांशी बोलताना केला. पटोले म्हणाले, भीमा कोरेगाव घटना घडली, त्यासाठी भिडे जबाबदार होते. दोन तीन दिवसात भिडे यांना अटक केली नाही तर आम्ही विधिमंडळात हे प्रश्न उचलून धरल्याशिवाय राहणार नाही. मुळात भाजप भिडेंचा वापर करुन महाराष्ट्राचे मणिपूर करू पाहत आहे का? अशी भीती अनेकांना वाटते.
नरेंद्र मोदी खासगी पुरस्कार स्वीकारत आहेत. मोदी असे पुरस्कार स्वीकारून पंतप्रधान पदाचा अवमान करत आहेत. दरम्यान, काँग्रेस भाजप विरोधात कायम लढा देत आहे. शरद पवार यांचे नाव न घेता इतर पक्षांनी काय करावे, हे त्यांनी ठरवावे. आमचे धोरण स्पष्ट आहे. भाजप विरोधात लढताना जे आमच्या सोबत येतील त्यांनी यावे. मात्र, दुसऱ्या पक्षांनी काय करावे? हे त्यांचे त्यांनीच ठरवायचे आहे, असेही नाना पटोल या वेळी बोलताना म्हणाले आहेत.