

Nitin Gadkari On Devendra Fadnavis Book: नागपुरात नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील अजिंक्य योद्धा या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित होते. अजिंक्य योद्धा हे पुस्तक प्रा. अरुण करणे यांनी लिहिले आहे. या प्रकाशन सोहळ्यावेळी भाषण करताना नितीन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली होती. याचबरोबर त्यांनी सध्याचे राजकारण आणि राजकीय घराणेशाही याच्यावर देखील टीका केली.
नितीन गडकरी आपल्या भाषणात बोलताना मुलांसाठी, पती-पत्नी अन् नातेवाईकांसाठी निवडणुकीत तिकीट मागणाऱ्या राजकारण्यांना खडे बोल सुनावले. ते म्हणाले की, आजचे आई-वडील मुलांसाठी तिकीट मागणी करतात. त्यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे उत्तम उदाहरण आहे.
गडकरी पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधर फडणवीस हे देखील राजकारणात आहेत. मात्र त्यांनी कधीही आपल्या मुलासाठी तिकीट मागितले नाही. उलट त्यांना पक्षाकडून विचारणा झाल्यावर त्यांनी याबाबतचा अंतिम निर्णय हा देवेंद्रच घेईल असं सांगितलं होतं.
गडकरींनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करताना राजकारणात आल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं. ते मुख्यमंत्री झाले.
याचबरोबर गडकरी यांनी सत्ता असताना राजकारण्यांच्या पुढं मागं कशी गर्दी असते अन् सत्ता गेल्यावर कसे ते एकटे पडतात हे सांगितलं. ते म्हणाले, गुळाच्या ढेपेला मुंगळे आपोआप येऊन चिकटतात, त्यांना सांगावे लागत नाही. अनेकदा गूळ खाऊन संपला के ते मुंगळे पळून जातात.
सत्तेत असणारे मंत्री आणि त्यांच्या पुढे मागे करणारे लोक जेव्हा मंत्री विरोधात जातो त्यावेळी ते दिसत नाहीत. म्हणून सत्ता असतानाही कार्यकर्ते आणि संघटेचं भान ठेवून काम केलं तर आपला विजय होत राहील.