

child marriage prevention Maharashtra
अलिबाग : राज्यात गेल्या दोन वर्षांत बालविवाह रोखण्यासाठी शासनाने अधिक कडक भूमिका घेत प्रभावी कारवाई सुरू केली आहे. बालविवाहात सहभागी होणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई केली जात आहे. या सातत्यपूर्ण उपाययोजनांमुळे बालविवाहाच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येत असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
रायगड जिल्ह्यात एकही बालविवाह होऊ नये, यासाठी महिला व बाल विकास विभागासह शासनाच्या विविध यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत. १८ वर्षांखालील मातांचे प्रमाण गेल्या पाच वर्षांत कमी होत असल्याचेही सकारात्मक चित्र समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवली जात असल्याचे सांगण्यात आले.
समाजामध्ये बालविवाह रोखण्यासाठी केवळ कायदेशीर कारवाई पुरेशी नसून व्यापक जनजागृती आणि प्रबोधन आवश्यक आहे. यासाठी गृह विभाग अर्थात पोलीस यंत्रणा तसेच जिल्हा प्रशासनाची मदत महत्त्वाची ठरणार असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.
दरम्यान, माजी मंत्री बच्चू कडू यांच्या कार्यपद्धतीबाबत बोलताना महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. “बच्चू कडू यांची काम करण्याची पद्धत वेगळी असून त्यांनी समाजहिताचे आणि विशेषतः दिव्यांगांच्या प्रश्नांवर सातत्याने प्रभावी भूमिका घेतली आहे. दिव्यांग समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे,” असे तटकरे म्हणाल्या.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांना पक्षाकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पुढील काळात ते आपले कार्य अधिक प्रभावीपणे राबवतील, अशी अपेक्षा असल्याचेही अदिती तटकरे यांनी व्यक्त केले.