

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : दिवाळीमध्ये फटाके फोडण्यासाठी आता निश्चित कालावधी निर्धारित करण्यात आला आहे. नागपुरातील प्रदूषित वातावरणात सतत वाढ होत असताना वायू प्रदूषणावर नियंत्रण आणून नागपूर शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशाने मनपाने फटाके फोडण्यासाठी सायंकाळी ७ ते रात्री १० वाजताची वेळ निर्धारित केली आहे. मुंबई उच्च न्यायालय आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशान्वये वायू गुणवत्ता संचालन विभागाच्या नोडल अधिकारी डॉ. श्वेता बॅनर्जी यांनी संबंधित विभागांना कार्यवाही करण्याचे निर्देश देखील दिले आहेत.
नागपूर शहरातील वायू प्रदूषण वाढत असून ही भविष्यासाठी धोक्याची घंटा आहे. या वेळांच्या योग्य पालनाबाबत कार्यवाहीच्या दृष्टीने मनपासह नागपूर पोलिस विभागाला देखील उच्च न्यायालयातर्फे सूचना देण्यात आली आहे. याशिवाय शहरामधील बांधकाम स्थळांबाबतही दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. इमारत बांधकाम स्थळावरील धूळ उडू नये व ते धुळीकण हवेत मिसळू नयेत, यासाठी बांधकामस्थळी लोखंडी पत्रे लावावेत तसेच सतत पाण्याची फवारणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, नागपूर सुधार प्रन्यास यांच्याद्वारे शहरात कार्य सुरू असलेल्या सर्व ठिकाणी देखील नियमित पाण्याची फवारणी करण्याची आवश्यक दिशानिर्देशामध्ये नमूद करण्यात आली आहे.
बांधकाम स्थळांवर वा अन्य ठिकाणी जमा असलेल्या सी अँड डी कच-याचे धुलीकण हवेत मिसळू नयेत यासाठी हा कचरा पूर्णपणे झाकलेला असावा, याशिवाय बांधकाम मलबा ट्रकमधून डम्पिंग यार्डमध्ये घेउन जाताना तो देखील पूर्णपणे झाकलेला असावा तसेच रेडी मिक्स क्राँक्रिट तसेच बांधकाम साहित्य देखील झाकूनच आणले व नेले जावे, अशी देखील सूचना करण्यात आलेली आहे. शहरात कुठेही कचरा जाळण्यास बंदी आहे. कचरा जाळणा-यांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे कुठेही कचरा जाळला जाऊ नये, याबाबत देखील निर्देश देण्यात आले आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या 'आपली बस' ताफ्यातील सर्व बसेस आणि सर्व शासकीय वाहनांचे पीयूसी तपासण्याचे देखील मनपा परिवहन विभागाला निर्देश देण्यात आले आहेत. दिवाळीमध्ये फटाके फोडल्यामुळे होणारे दुष्परिणाम आणि पर्यावरणावर पडणारा विपरित परिणाम यासंबंधी शहरातील सर्व शाळांमधून जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी मनपा शिक्षण विभागाला कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत.
हेही वाचा :