मुख्यमंत्री घटनाबाह्य काम करत आहेत : आदित्य ठाकरे यांचा आरोप | पुढारी

मुख्यमंत्री घटनाबाह्य काम करत आहेत : आदित्य ठाकरे यांचा आरोप

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री घटनाबाह्य काम करत आहेत. त्यांना सरकार चालवता येत नाही. राज्यात जागोजागी आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. मराठा आंदोलन लाठीचार्ज संदर्भात अधिकाऱ्याला सरकार निलंबित करतीलही पण लाठीचार्जचे आदेश कोणी दिले तो जनरल डायर कोण आहे, मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री हे शोधणे गरजेचे आहे. याकडे आज माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना लक्ष वेधले.

आज (दि. २२) मध्यप्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी जात असताना ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बोलवले म्हणून मी जात आहे.

ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्यासोबत आमचे जुने नाते आहे. तूर्तास मध्यप्रदेशमधील निवडणुकीत आम्ही सहभाग घेऊ किंवा नाही ह्याबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील असेही आदित्य ठाकरे म्हणाले. राज्य सरकार, सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे यासंदर्भात छेडले असता जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आपला आहे. पण, आता लोकशाहीच्या सर्व घोषणा होर्डिंगवरच शिल्लक आहेत.

जनतेवर नव्हे तर सर्व पैसे होर्डिंगवर खर्च होत आहेत. राज्यात दुष्काळ, नापिकीचे चित्र आहे. शेतकरी आपले जीवन संपवत आहेत त्यांना आतापर्यंत कुठलीही मदत मिळाली नाही. मंत्रिमंडळात महिलांना शिवीगाळ होत आहे, आंदोलन करणाऱ्यांवर राज्यात लाठीचार्ज होत आहे. एक गद्दार आमदार यांनी गणपतीच्या मिरवणुकित गोळी झाडली त्याचे बंदुकीचे लायसन्स पण रद्द करण्यात आले नाही. एका आमदाराचे मुलाने अपहरणसारखा गंभीर गुन्हा केला त्यावर सुद्धा कारवाई झालेली नाही आदी मुद्द्यांवर त्यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा :

Back to top button