नागपूर; पुढारी वृत्तसेवा : विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचे शुक्रवारी (दि. १४) वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. म्हैसाळकर यांनी गेल्या १६ वर्षांपासून विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्षपद भूषविले तसेच ५० वर्षांपासून ते सदस्य होते. त्यांच्या निधनाने विदर्भ साहित्य संघाचे 'मॅनेजमेंट गुरु' हरविल्याची भावना साहित्य क्षेत्रात होत आहे.
किडनीच्या आजाराने ग्रासल्याने त्यांना गुरुवारी (दि. १३) नागपुरातील खाजगी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले होते. रुग्णालयात त्यांनी आज सायंकाळी ६ च्या दरम्यान अंतिम श्वास घेतला. उद्या नागपुरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई, बहीण, भाऊ, नातवंडे आणि बराच मोठा परिवार आहे. प्रा. सुरेश द्वादशीवार यांचा १५ वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर २००६ साली त्यांनी विदर्भ साहित्य संघाची धुरा आपल्या हाती घेतली. मनोहर म्हैसाळकर २००६ सालापासून विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाची धुरा एक हाती सांभाळत होते.
साहित्यासह सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या, आपल्या कुशल संघटन कौशल्याने साहित्य संघाला नवे भव्य स्वरूप प्राप्त करून दिले. मनोहर म्हैसाळकर यांच्या सारख्या दिग्गज व्यक्तिमत्त्वाने विदर्भ साहित्य संघाचे कार्य केवळ विदर्भापुरते मर्यादित न ठेवता महाराष्ट्रात पसरविले. यामुळे, साहित्य संघास अग्रणी स्थान प्राप्त झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच विदर्भासह महाराष्ट्राच्या साहित्य वर्तुळात शोककळा पसरली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर संदेश लिहीत आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या.
नागपूर येथील सोमलवार हायस्कूलमध्ये सहा वर्ष शिक्षक म्हणून काम केल्यानंतर २६ वर्ष त्यांनी मॅगनीज और इंडियातही काम केले. तिथून स्वेच्छा निवृत्ती घेऊन ते साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय झाले. १९८३ मध्ये ते विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस झाले. २००६ पासून ते अध्यक्ष होते. यावर्षी झालेल्या निवडणुकीत सलग चौथ्यांदा अध्यक्षपदी निवडून आले होते. १९७२ मध्ये ते साहित्य संघात आले. तेव्हापासून गेली ५० वर्ष साहित्य संघाशी जुळले होते.
साहित्य संघाचे हे शतकमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे संघातर्फे विविध कार्यक्रमही सुरू आहेत. पुढील वर्षी २०२३ मध्ये वर्धा येथे साहित्य संमेलन होणार आहे. अशा वेळी म्हैसाळकरांच्या मार्गदर्शनाची गरज असताना ते गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. २००७ मध्ये साहित्य संमेलन नागपुरात खेचून आणण्यात मनोहर म्हैसाळकरांचा सिंहाचा वाटा होता. साहित्य, संस्कृतीसह अनेक संस्था व संघटनांशी त्यांचा संबंध होता.
हेही वाचा;