गोंदिया : ट्रकच्या धडकेत शेतकरी ठार; देवरी तालुक्यातील घटना | पुढारी

गोंदिया : ट्रकच्या धडकेत शेतकरी ठार; देवरी तालुक्यातील घटना

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : देवरी तालुक्यातील मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील भर्रेगाव फाट्याजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार दूध उत्पादक शेतकऱ्याचा मृत्यू झाला.  ही घटना मंगळवार (दि. ९) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. अनंतराम भदरू सलामे (वय ५२, रा. भर्रेगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

अनंतराम सलामे हे नेहमीप्रमाणे सायंकाळी देवरी येथे दूध वाटप केल्यानंतर आठवडी बाजार करून दुचाकीने (क्र. एमएच ३५ झेड ६८४१) घरी जात होते. त्याचवेळी राष्ट्रीय महामार्गावर भर्रेगाव फाट्याजवळ रायपूरकडून नागपूरच्या दिशेने जात असलेल्या ट्रकने (क्र. एमएच १२ व्ही बी ७१९७) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अनंतराम हे दूध उत्पादक शेतकरी असून, त्यांचा दैनंदिन दुधाचा व्यवसाय होता. घरच्या कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. घटनेची नोंद देवरी पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

अपघाताचे कारण उड्डाण पूल!

भर्रेगाव फाट्यावर वन्यजीव संरक्षणाकरिता उड्डाण पुलाची निर्मिती करण्यासाठी शासनाने अग्रवाल ग्लोबल कंपनीला कंत्राट दिलं आहे. मात्र, सदर कंपनीकडून उड्डाण पुलाचे बांधकाम कासवगतीने होत आहे. सद्यस्थितीत बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, भर्रेगाव फाट्यावर दोन्ही दिशेने येणार्‍या पुलाचे उतार मार्ग आहेत. त्यातच रस्ता दुभाजक करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे प्रवाशांचा अंदाज चुकून याठिकाणी नेहमी अपघात घडतात. या अपघाताला अग्रवाल ग्लोबल कंपनी व बांधकाम करण्यात आलेला सदोष उड्डाण पूल कारणीभूत असल्याचे परिसरातील गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : 

Back to top button