

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या सत्तेत परिवर्तन घडवून आणणारे आणि चंद्रपूरचा चौफेर विकास साधणारे सुधीर मुनगंटीवार हे कर्तृत्व-वक्तृत्व-नेतृत्वाचा तिहेरी संगम आहेत. त्यांना ऐतिहासिक मतांनी विजयी करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघातील जनतेला केले. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी आज (दि.२६) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला . यापुर्वी गांधी चौक येथील आयोजित सभेत उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी खा. हंसराजजी अहिर, खा. रामदास तडस, आ. संदीप धुर्वे, आ. संजीव रेड्डी बोदकुरवार, आ.अशोक उईके, आ. महेश बालदी, आ. प्रशांत ठाकूर, माजी आमदार आशिष देशमुख, संजय धोटे, सुदर्शन निमकर, भाजपा ज्येष्ठ नेते चंदन सिंग चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत,प्रमोद कडू, राजेंद्र गांधी विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर, लोकसभा विस्तारक रवी बेलूरकर,भाजपा महिला प्रदेश सचिव वनिताताई कानडे, भाजपा नेते अशोक जीवतोडे, राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष नितीन भटारकर यासह भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
ना. सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संपूर्ण देशातून त्यांना मानवंदना मिळवून दिली. इंग्रजांनी चोरून नेलेली ऐतिहासिक छत्रपतींची वाघनखे परत आणण्यासाठी धडपड केली. अशा अनेक अस्मितेच्या मानकां संदर्भात त्यांनी उत्तम काम केले आहे. त्यांनी विकासाची गंगा आणून चंद्रपूरचा चेहेरामोहरा बदलला आहे. चंद्रपूरचे मुलुख मैदान गाजवणा-या ना. सुधीर मुनगंटीवार यांची तोफ आतापर्यंत मुंबईत धडकत होती आता ती दिल्लीत धडकणार आहे, अशा आशावाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
ही निवडणूक राज्याची नाही तर देशाची निवडणूक असून देशाचा नेता कोण असेल, देशाचे नेतृत्व कोणाच्या हाती द्यायचे याचा निर्णय जनतेने घ्यायचा आहे. देशामध्ये मोदीजींचे राज्य आणायचे की राहूल गांधींचे हे ठरवायचे आहे. देशाचा विकास करायचा असेल तर सर्व समाजाला जो सोबत घेऊन चालू शकतो, समाजाची दु:ख मांडू शकतो अशा नेत्यालाच निवडून द्या. तसा नेता म्हणजे सुधीर मुनगंटीवार असून त्यांना ऐतिहासिक मतांनी निवडून देण्याचा निर्धार चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघातील जनतेने करावा, असे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा :