चंद्रपूरसारखं साहित्य संमेलन गेल्या दहा वर्षात झालं नाही : अध्यक्ष डॉ. वि. स. जोग

चंद्रपूरसारखं साहित्य संमेलन गेल्या दहा वर्षात झालं नाही : अध्यक्ष डॉ. वि. स. जोग

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : सर्व सत्यापेक्षा ग्रंथ सत्ता ही मोठी आहे. अशा प्रकारचे साहित्य संमेलन होत राहावे. यापुढेही अखिल भारतीय साहित्य संमेलन चंद्रपुरात होईल, अशी अशा त्यांनी व्यक्त केली. लता मंगेशकर, मधुबाला यांच्यासारखा दुसऱ्या कोणी नाहीत. त्याचप्रमाणे चंद्रपूरसारखे संमेलन गेल्या दहा वर्षात झालं नाही, असे प्रतिपादन विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. वि. स. जोग यांनी प्रतिपादन केले.

गोडवाना विद्यापीठ गडचिरोली, सर्वोदय शिक्षण मंडळ, चंद्रपूर, सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी झाला, त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून आ. विजय वडेट्टीवार, स्वागताध्यक्ष गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे , प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, अध्यक्ष विदर्भ साहित्य संघ प्रदीप दाते, कार्याध्यक्ष रविंद्र शोभणे, कार्याध्यक्ष -प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, सरचिटणीस विदर्भ साहित्य संघ विलास मानेकर, माजी कुलगुरू डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, केंद्रीय प्रतिनिधी विदर्भ साहित्य संघ डॉ. श्याम मोहरकर, संजय वैद्य, दिग्दर्शक शैलेश दुपारे इरफान शेख आदींची उपस्थिती होती.

यावेळी स्वागताध्यक्ष कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले की, साहित्य संमेलन उभे करणे, इतक्या लोकांची व्यवस्था करणे हे कार्य सोपं नसतं. हे सगळं करत असताना साहित्य संमेलनाचे प्रयोजन हे रसिकांसाठी होतं, रसिकांनी या संमेलनाला मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. कलावंतांविषयी, कवी, लेखकांविषयी रसिकांना नेहमीच उत्सुकता असते. साहित्यिक मंडळी आपल्या शब्द लेण्यांनी आपला आयुष्य उजळून टाकतात म्हणून रसिक साहित्य संमेलनाला हजेरी लावत असतो त्याच्या साहित्याला भरभरून प्रतिसाद देत असतो. हे साहित्य संमेलनाचा प्रयोजन १०१ टक्के यशस्वी झाले आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलन चंद्रपूरला आयोजित करण्याचा आशावाद ही त्यांनी व्यक्त केला.

मनोगत व्यक्त करताना आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, चंद्रपूरचा एकूणच राजकीय आणि सामाजिक इतिहास जर आपण पाहिला तर चंद्रपूर सोन्याच्या हिऱ्याची खान असलेली ब्लॅक गोल्ड सिटी आहे. अनेक साहित्यिक या मातीने दिलेले आहे. साहित्याने समाज परिवर्तन होऊ शकते. विदर्भातील कवींचे लेखकांची यादी काढली तर महाराष्ट्र उभा करण्याची ताकद या साहित्यिकांमध्ये आहे. साठवलेले धन एके दिवशी संपेल पण साहित्याचे दान कधीही संपत नाही. साहित्यिकांनी लिहिलेले वाचल्यामुळे जगण्याची नवी ऊर्जा निर्माण होईल, असे ते म्हणाले.

संमेलनात मान्यवरांचा सत्कार

६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचा समारोपीय कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्रशांत पोटदुखे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, कार्याध्यक्ष, प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, इरफान शेख, दिग्दर्शक शैलेश दुपारे यांचा समावेश होता.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news