गोंदियाकरांवर सुर्यदेव कोपला; जिल्हात सातत्याने तापमान वाढ

गोंदियाकरांवर सुर्यदेव कोपला; जिल्हात सातत्याने तापमान वाढ

गोंदिया; पुढारी वृत्तसेवा : विदर्भासह जिल्ह्यात उष्णतेची लाट सुरू आहे. दिवसेंदिवस रेकॉर्ड तापमानाची नोंद होत असताना तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यात काल (दि. ३१) जिल्ह्यात रेकॉर्ड ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली असताना आज, १ जून रोजी देखील ४४.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे.

गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यावर सुर्याचे आग ओकणे सुरू असल्याने भीषण उष्णता निर्माण झाली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिक घराबाहेर निघणे टाळत असल्याने सकाळी ९ वाजतापासून रस्ते निर्मनुष्य होत आहेत. यामुळे रस्त्यासह गल्लोगल्लीत सुकसुकाट दिसून येत आहे. दरम्यान या वाढत्या तापमानाचा मानवी आरोग्यावरही परिणाम होत आहे. जिल्ह्यात नवतपा चांगलाच तापत असल्याची अनुभूती गोंदियाकरांना येत आहे. सुर्यदेवाचे आग ओकणे सुरू असल्याने उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण झाले आहेत.

त्यातच हवामान विभागाचा अंदाज खरा ठरत असून विदर्भात उष्णतेची लाट पसरलेली आहे. मागील आठवडाभरापासून तापमानाचा पारा चांगलाच चाढला आहे. सतत वाढणार्‍या तापमानाचे जिल्ह्यात नवीन रेकॉर्ड नोंदविले जात आहेत. गेल्या तीन दिवसाच्या तापमानाच्या नोंदी पाहता जिल्ह्यात गुरुवारी (दि.३०) तीन वर्षातील सर्वाधिक ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती.

तर शुक्रवारी (दि.३१) त्यात पुन्हा ०.२ अंशाची वाढ होऊन ४५ अंश तापमान नोंदविण्यात आले. तर, आज (दि.१) ४४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद संबंधित विभागाकडून करण्यात आली आहे. वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांकडून सकाळी ९ नंतर घराबाहेर निघणे टाळले जात आहे. तर उष्णतेपुढे घरातील पंखे, कुलर आदी उपकरणांनीही नांगी टाकल्याचे चित्र असून उकाळ्यात चांगलीच वाढ झाली असून उष्माघाताच्या रुग्णसंख्येतही वाढ होत असल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.

उष्माघाताने एकाचा बळी

जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील निमगाव येथील सुरेश उरकुडा गेडाम (वय ४५) यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. ३१) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली. सुरेश गेडाम गतिमंद होते. त्यांचा सांभाळ वृद्ध आई करीत होती. गावात फिरणे हा त्यांचा नित्यक्रम होता. प्रकृती ठणठणीत असतानाच शुक्रवारी सायंकाळी उन्हामुळे त्यांची प्रकृती एकाएकी बिघडली. त्यांना गावातील डॉक्टरांकडे प्रथमोपचार करण्यात आले. परंतु, काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.

५ जूनपर्यंत यलो अलर्ट

दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असतानाच हवामान खात्याकडून जिल्ह्यात पुढील पाच दिवस ५ जूनपर्यंत येलो अर्लट जाहीर करण्यात आलेला आहे. यात जिल्ह्यातील काही ठिकाणी उष्णतेची लाट तर काही भागात विजेच्या कडकडाटीसह वादळाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

३ वर्षातील सर्वाधिक तापमान…

पर्यावरणाचा दिवसेंदिवस होत असलेला र्‍हास आणि वाढलेले सिमेंटीकरणाचे जंगल तापमान वाढीला पोषक ठरत आहेत. दरवर्षी गोंदिया जिल्ह्याचे तापमान ४४ अंशावर स्थिरावतो. मागील ३ वर्षात तापमानाचे उच्चांक ४४.६ अंश एवढे होते. त्यातच गुरुवारच्या तापमानाने उच्चांकी आकडा गाठला होता. त्याहूनही अधिक काल शुक्रवारला तापमानाने ४५ अंशावर पोहोचून नवा रेकॉर्ड नोंदविला. तर शनिवारीही उन्हाच्या झळा गोंदियाकरांना सोसाव्या लागल्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news