नागपूर, पुढारी वृत्तसेवा : आज टोल वसुली करणारेच सरकारमध्ये बसलेले आहेत. सत्तेत येण्यापूर्वी आश्वासन दिले होते. 2014 मध्ये जे वचन दिले होते, त्याचे काय? केवळ दोन चार गाड्यांना टोल माफी देऊन चालणार नाही, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे राज्याचे मंत्री आहेत, त्यांनी काँग्रेसकडे लक्ष देण्याची गरज नाही. बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्यांना उत्तर देण्याची गरज नाही, असेही पटोले यांनी (Nana Patole) त्यांना सुनावले.
पटोले म्हणाले की, काँग्रेस लोकांच्या मनात आहे, संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस हाच पर्याय. जे चित्र महाराष्ट्रात आहे, त्यावरून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल. ज्यांच्या सीट्स जास्त त्यांचा मुख्यमंत्री होईल, असेही पटोले म्हणाले. पंतप्रधान जगात जाऊन खोटं सांगतात. पंतप्रधानांनी हजारो कोटी रुपयांचे विमान घेतले, गाड्या घेतल्या, त्यातून लोकांचे पोट भरत नाही. मुळात गरिबी ही जात आहे, असे पंतप्रधान म्हणत असतील, तर भाजपला गरिबांना मारायचे आहे का ? महागाई वाढवली आहे. आश्वासनांची पूर्तता हे सरकार करू शकले नाही. आज कृषी मालाला भाव मिळत नाही. (Nana Patole)
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ओबीसी आणि जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. त्यावरून प्रत्येक समाजाला आर्थिक आणि शैक्षणिक मजबूत करण्याचा संकल्प राहुल गांधी यांनी घेतला आहे. मध्यप्रदेशात बहुमताचा अपमान करण्यात आला होता, त्याचा राग लोकांच्या मनात आहे. या सरकारने प्रत्येक स्तरावर लोकांना त्रास दिला आहे. पाचही राज्यात हीच परिस्थिती आहे. राजस्थानमध्ये हेल्थ कायदा तयार करण्यात आला आहे. छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठे काम झाले. दिलेले वचन पूर्ण करण्याचे काम काँग्रेसने केले आहे.
दरम्यान, मनोज जरांगे- पाटील या संदर्भात छेडले असता ज्या सरकारमध्ये भुजबळ आहेत, त्यावर मला काही बोलायचे नाही. त्यांनीच लावलेली ही आग आहे. सत्तेतील लोकांनी हा खेळ थांबवला पाहिजे. शेतकऱ्यांची मदत झाली पाहिजे, दुष्काळ जाहीर केला पाहिजे, कंत्राटी भरती होता कामा नये. ललित पाटील या व्यक्तीने अनेक तरुणांचे आयुष्य बरबाद केले. त्याला मदत केली जाते, शेवटी राज्यात कायदा- सुव्यवस्था कायम आहे का? असा सवालही पटोले यांनी यावेळी केला.
हेही वाचा