नागपूर; पुढारी वृत्तसेवा: राज्याचे उद्योगमंत्री महाराष्ट्रामधून गुजरातला उद्योग बघायला गेले होते. हे सरकार आउटसोर्सिंगचे सरकार आहे. महाराष्ट्रात कंत्राटी पद्धतीने भरती करत, कायदा सुवस्थेचा खेळ खंडोबा करू नये. या निर्णयामुळे सुरक्षेचे तीन तेरा वाजतील. महाराष्ट्राचे वेगळे अस्तित्व आहे. हे महाराष्ट्र खपवून घेणार नाही, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. पूर्व विदर्भ बैठकीच्या निमित्ताने ते माध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट असल्यासंदर्भात छेडले असता पटोले म्हणाले, असे आरोप लावण्यापेक्षा कारवाई करावी. ते सत्तेत आहेत, पुरावे असतील तर कारवाई करा. असा खेळ करू नका, राज्याच्या जनतेचा खेळ न करता हा लाफिंग शो थांबवा. आमदार अपात्रता सुनावणीवर बोलताना ते म्हणाले, त्यांचं ते कामकाज आहे. त्यांनी ते करावे, सुप्रीम कोर्ट लक्ष ठेवून आहे, मी त्यावर बोलणार नाही, अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली.
मुनगंटीवार यांच्या लंडन दौऱ्यावर बोलताना पटोले म्हणाले, ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे. जनतेला राहुल गांधी यांच्या विश्वासार्हतेची खात्री आहे. ते फेकू नाहीत, जनतेला आशा आहे. त्याला कोणीही नाकारू शकत नाही. मोठ्या विद्यापीठात लोक त्यांना ऐकण्यासाठी जमा होत असतात, यावर नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना भर दिला.