Incident In Yavatmal Flood : पुराचे पाणी घरात शिरल्यानंतर मुलींना वाचविणाऱ्या आईचा मृत्यू; यवतमाळमधील घटना | पुढारी

Incident In Yavatmal Flood : पुराचे पाणी घरात शिरल्यानंतर मुलींना वाचविणाऱ्या आईचा मृत्यू; यवतमाळमधील घटना

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : यवतमाळमध्ये मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. या पूरपरिस्थितीत वाघाडी येथील वस्तीत पाणी शिरल्यानंतर आपल्या मुलींना वाचविताना आईच्या अंगावर पत्र्याचे शेड पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
यवतमाळ शहरालगत असलेल्या वाघाडी नदीला पूर आला. या नदीचे पाणी वाघाडी येथील वस्तीत शिरले. रात्रीच्या अंधारात अचानक आलेल्या पुरामुळे सर्वांचीच दाणादाण उडाली. घरात पुराचे पाणी येत असताना दोन चिमुकल्या मुलींना घराबाहेर काढल्यानंतर आईच्या अंगावर पत्र्याचे घर कोसळले. पाण्याची पातळी वाढल्याने महिलेला बाहेर पडता आले नाही, यात तिचा मृत्यू झाला. पुरामुळे अनेकजण वाहून गेली, ५० घरे जमीनदोस्त झाली. शालू रवींद्र कांबळे (३५, रा. वाघाडी) असे मृत महिलेचे नाव आहे.
वाघाडीमध्ये पूर आल्याची माहिती मिळताच बचाव पथक, अवधूतवाडी पोलीस, नगर परिषदेची यंत्रणा, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी घटनस्थळी पोहोचले व तत्काळ बचाव कार्य सुरू केले. १५० वर नागरिकांना सुखरूप बाहेर काढले. त्यांना रेल्वेच्या निर्माणाधीन वसाहतीमध्ये आश्रय दिला. त्याच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. मोलमजुरी करणाऱ्यांची घरे पूर्णत: उद्ध्वस्त झाली.  यवतमाळ शहरतील अनेक भागांत घरांमध्ये पाणी शिरल्याने माेठे नुकसान झाले.
हेही वाचा

Back to top button