नागपूर : टेकडी गणेश मंदिरासमोरचा टेकडी उड्डाणपूल तोडण्याचे काम सुरू
![](https://pudhari.news/wp-content/uploads/2023/07/नागपूर-2-780x470.jpg)
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : गणेश मंदिर टेकडी येथील भाविकांना तसेच मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर ये-जा करण्यास अडचणींचा ठरणारा टेकडी उड्डाणपूल तोडण्याचे काम अखेर महामेट्रोतर्फे सुरू झाले आहे. पर्यायी व्यवस्था दिल्यानंतरही अनेकजण न्यायालयात गेले आता कोर्टाचा निकाल आल्यानंतर उड्डाणपुलाखालील दुकाने रिकामी करून वीजपुरवठा खंडित करण्यात आला. महानगरपालिकेने बांधकाम पाडण्यास महामेट्रोला परवानगी प्रदान केली आहे.
८१२ मीटर लांब आणि १०.५ मीटर रुंद असा हा टेकडी उड्डाणपूल २००८ मध्ये १६.२३ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला. या उड्डाणपुलाखाली एकूण १७५ दुकाने बांधण्यात आली. परंतु, जयस्तंभ चौक परिसरातील वाहतूक कोंडी लक्षात घेता व वाहतुकीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जयस्तंभ चौकाच्या आजूबाजूच्या रस्त्याच्या परिसरात योग्य ते बदल करण्याचे प्रस्तावित करत योजना आखण्यात आली. ज्यामध्ये किंग्जवे येथे वाय शेप उड्डाणपूल आणि सध्याच्या लोखंडी पुलाजवळ रेल्वे-अंडर-ब्रिज (RuB) प्रस्तावित करण्यात आला. या दोघांसह उड्डाणपूल पाडून या ठिकाणी रस्ता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल टेक्नॉलॉजी (VNIT) द्वारे या संपूर्ण प्रस्तावाला मंजुरी प्रदान करण्यात आली. सदर विकास कार्याचा अहवाल २०१८ मध्ये सादर करण्यात आला. आणि त्यानंतर संपूर्ण काम महामेट्रोला डिपॉझिट वर्क तत्त्वावर देण्यात आले. दुकानदारांना सामावून घेण्यासाठी महामेट्रोने १११ दुकाने बांधली आणि ती त्यांना वाटपासाठी महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आली.
एनसीसी ( NCC) द्वारे मेसर्स मॅटच्या माध्यमातून उड्डाणपूल पाडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या एजन्सीने वर्धा रोडवरील छत्रपती चौक येथील उड्डाणपूल पाडला होता. टेकडी उड्डाणपूल पाडण्याची प्रक्रिया साधारणपणे १५ दिवसांत पूर्ण होणार आहे.
हेही वाचा :