नागपूर : केवळ नाव नको महापुरुषांच्या विचाराने वागा; नाना पटोले यांचा सरकारला सबुरीचा सल्ला | पुढारी

नागपूर : केवळ नाव नको महापुरुषांच्या विचाराने वागा; नाना पटोले यांचा सरकारला सबुरीचा सल्ला

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर नामकरणाचा निर्णय स्वागतार्ह आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी पुरोगामी विचार दिला त्या विचाराने सरकारने काम करावे, केवळ नाव देण्याची घोषणा करून खिरापत वाटण्याचं काम सुरू आहे. मुळात जनतेला सांगण्यासाठी यांच्याजवळ जनतेच्या हिताचे काम नाही, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना केला.

यावेळी पटोले म्हणाले की, आधीच औरंगाबाद नावाचा घोळ कायम आहे, सरकारने भूमिका स्पष्ट करावी. महाराष्ट्र सदनात सावरकर जयंतीसाठी महापुरुष प्रतिमा बाजूला केली. सरकारने या दोन तोंडी कारभाराचे आधी उत्तर द्यावे. कारण, लोकांचा विश्वास आता सरकारवर राहिला नाही. हे नापास झालेले सरकार आहे. कितीही प्रयत्न केला तरी डॅमेज कंट्रोल होऊ शकत नाही. सातत्यानं कुणबी मराठामध्ये भांडण लावण्याच काम सुरू आहे. नागपूर कोर्टात फडणवीस यांनी दोन गुन्हे लपवले, त्यात वकिलांनी माहिती लपवली असे सांगितले, कोण कोणाची दिशाभूल करत आहे. मराठा कुणबी हे काय चाललंय महाराष्ट्रात, कुणबीला किती आरक्षण आणि मराठा यांचं आरक्षण किती स्पष्ट करावे. दोन समाजात भांडण लावण्याचं काम हे सरकार करत आहे का? हे स्पष्ट करावे. मराठा कुणबी समाज जागृत आहे, हा डाव यशस्वी होणार नाही, लोकांची दिशाभूल करण्याच काम सरकार करत आहे, मराठ्यांना कुणबी करू असे म्हणत आता सरकारने फसगत करू नये, असेही पटोले यांनी म्हटले आहे.

सरकार मनमानी काम करत आहे, जाहिरातीवर हजारो कोटी खर्च करणे ही जनतेच्या पैश्याची लूट आहे. शहराचे नाव बदलून भाजपला फायदा होणार नाही. मागील 9 वर्षांपासून विश्वगुरू होणार म्हणणारे यांनाही फायदा होणार नाही. ओबीसी समाजाचे आरक्षण काढून मराठा समाजाला देणार आहे, असे सांगून राजकीय पोळी शेकण्याचं काम भाजप सरकार करीत आहे. आयोग नेमण्याचा अधिकार सरकारला नाही, राज्य विधिमंडळात कायदा करून समाजाची फसवणूक केली. शब्दफेक करून कुणबी मराठ्यांत भांडण लावण्याचे काम केले जात आहे. कोरोना काळात मविआ सरकारने लोकांचा जीव कसा वाचवला, हे महत्वाचे असल्याने फडणवीस यांनी उगीच लकव्याची भाषा करू नये. पहिले केंद्र सरकारच्या धोरणाचा अभ्यास करावा नंतर फडणवीस यांनी बोलावे, असे खडेबोल पटोले यांनी सरकारला सुनावले.

हेही वाचा :

 

Back to top button