पुढारी ऑनलाईन डेस्क : रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर बुधवारी (दि.१९) रात्री उशिरा दरड कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ७५ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी पोहचले आहेत. बचाव कार्याठी अग्निशमन दल, एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. (Irshalwadi landslide)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की,रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना बुधवारी (दि.१९) मध्यरात्री घडली. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ही घटना कळताच काल मध्यरात्रीपासूनच मी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे.
प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता ते गतीने होत आहे. प्राथमिक माहितीनुसार एकूण 48 कुटुंब येथे आहेत. सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत, असेही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा