नागपूर; पुढारी वृत्तसेवा : aryan khan case : देशात गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानसाठी आता शिवसेनेच्या एका नेत्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेनेच्या किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात ईमेल द्वारे याचिका दाखल करून आर्यन खानच्या सुटकेची मागणी केली आहे. तसेच एनसीबीच्या कामाची चौकशी करण्याची मागणीही तिवारी यांनी केली आहे.
किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात ई-मेलद्वारे याचिका दाखल केली असून त्यांची याचिका दाखल करून घेण्यात आली आहे. एकीकडे ३ हजार किलो ड्रग्ज मिळतात. मात्र मुंबई किंवा बॉलिवूडला धरून एनसीबी बदनामी करत आहे. त्यात काही तथ्य निघत नाही. एनसीबी ही स्वतंत्र संवैधानिक संघटना असून आपल्या पदाचा गैरवापर करत आहे. आर्यनची केस ही शुल्लक केस आहे. त्यात काही रिकव्हरी नाही. पजेशन नाही. आर्यनला २४ तासासाठी अटक करण्यात आली आहे. नंतर त्याला इंटरनॅशनल पेडलर ठरवलं गेलं. मग त्यात इंटरनॅशल रॅकेटही आलं. या सर्व ट्रायलच्या गोष्टी असून त्याला बेल मिळणे हा त्याचा हक्क आहे, असं तिवारी यांनी सांगितलं. इतरांना जामीन होतो. त्याला १७ दिवसांपासून आत ठेवलं आहे, याकडेही त्यांनी याचिकेत लक्ष वेधलं आहे.
एनसबीच्या कामाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आल्याचं किशोर तिवारी यांनी सांगितलं. एनसीबीने मूलभूत हक्कांचा भंग केला आहे. आर्यनचे मूलभूत अधिकार गोठवून ठेवले आहेत. सुट्टी आहे म्हणून त्याला पाच दिवस डांबून ठेवलं गेलंय, असं सांगतानाच झोनल अधिकाऱ्याचा बॉलिवूडमध्ये वेस्टेड इंट्रेस्ट आहे. त्यांची पत्नी सिनेमात काम करते. मॉडल आहे. हा माणूसही कलाकारासारखं काम करतो. हा सर्व त्यांचा दुराग्रह आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. समीर वानखेडे एखाद्या कार्यकर्त्यासारखे काम करतात. वानखेडे यांची हकालपट्टी करण्यात यावी आणि आर्यनला बेल मिळावी, अशी मागणीही तिवारी यांनी केली आहे.