कॅन्सरमुक्त भारतासाठी एनसीआय महत्वाची भूमिका बजावेल : नितीन गडकरी

कॅन्सरमुक्त भारतासाठी एनसीआय महत्वाची भूमिका बजावेल : नितीन गडकरी
Published on
Updated on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : संशोधनाच्या जोरावरच आपण कॅन्सरसारख्या रोगाला रोखू शकतो. कॅन्सरमुक्त भारतासाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट अर्थात एनसीआय ही संस्था महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास केंद्रीय परिवहन, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केला. नागपुरातील जामठा येथे डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेद्वारे स्थापित एनसीआयच्या लोकार्पण सोहळ्याला ते संबोधित करत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून येणार होते मात्र त्यांचा दौरा रद्द झाला.

याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शंखपूजन, दीपप्रज्वलन आणि कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. या संस्थेतून कॅन्सरविषयी प्रतिबंधात्मक उपचार त्याचप्रमाणे निदान होईल. जागतिक स्तरावरील अद्यावत तंत्रज्ञानासोबत जॉईंट वेंचर करून या संशोधनाद्वारे कॅन्सरच्या उपचारांमध्ये आपल्याला मदत होईल, असे प्रयत्न करायला हवे असे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले. या संस्थेत थॅलेसेमिया आणि सिकलसेलवर अधिक संशोधन आणि उपचार यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ही दिलासादायक बाब असून पूर्व विदर्भातील रुग्णांना याचा लाभ होईल, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.

याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयाच्या बांधकामाची प्रशंसा केली. येथील जनरल वॉर्ड सुद्धा एखाद्या पंचतारांकित हॉटेल सारखा असून येथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत, असे त्यांनी सांगितले. कॅन्सरसारख्या आजारावर गुणवत्तापूर्ण उपचार उपलब्ध करून देणे हे एक आव्हान असून या सुविधा किफायतशीरपणे उपलब्ध करून देण्यास शासन प्रयत्नशील आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता योजना या योजनांद्वारे सर्वसामान्यांना आधार दिला जात आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कर्करोगासारखा आजार जडल्यास आयुष्यभराची पुंजी द्यावी लागते परंतु एनसीआय सारख्या संस्थेत किफायतशीर दरात हा उपचार उपलब्ध असून त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळेल. अशा हजारो कर्करोग रुग्णांसाठी एनसीआय मधील डॉक्टर्स आणि नर्सेस देवदूत म्हणून काम करतील, अशी आशा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

मुंबईमध्ये टाटा कॅन्सर रुग्णालयात रुग्णालयावर प्रचंड असा ताण पडत होता. मध्य भारतातील कर्करोग रुग्णांची सोय व्हावी यासाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना केली. यामध्ये बालकांसाठी 'पेडियाट्रीक वॉर्ड' मध्ये नि:शुल्क उपचार केले जात आहेत. कॅन्सरच्या उपचार क्षेत्रातील प्रोटोन बिम, कार्बन आयन थेरपी सारख्या अत्याधुनिक यंत्रणा किफायतशीर दरात एनसीआयमध्ये उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. देशाच्या विविध भागातून येणा-या रुग्णांच्या नातेवाईकांच्या राहण्यासाठी धर्मशाळा सुद्धा या ठिकाणी उभारली जाईल. थॅलेसेमिया, सिकलसेल या रक्तासंदर्भातील आजाराव येथे संशोधन होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. एनसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर यांनी सांगितले की, ही इमारत दहा मजली असून 7.5 लाख वर्गफुट क्षेत्रात पसरलेली आहे. विविध विभागात कर्करोगाच्या उपचाराकरिता सर्व सुविधा एकाच छताखाली येथे उपलब्ध आहेत.

याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, एनसीआयचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुनील मनोहर, उपाध्यक्ष माजी खासदार अजय संचेती, संस्थेचे महासचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर, कोषाध्यक्ष आनंद औरंगाबादकर, संस्थेचे वैद्यकीय संचालक डॉक्टर आनंद पाठक, एनसीआयचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

न डगमगता कॅन्सर विरोधात लढणे महत्वाचे : मोहन भागवत

ज्या सेवाभावाच्या वृत्तीने एनसीआय निर्माण केले गेले त्याच वृत्तीने ही संस्था, हे हॉस्पिटल पुढे सुद्धा अग्रेसर राहील. यासाठी समाजातर्फे सुद्धा प्रयत्न झाला पाहिजे. संकटाला न घाबरता, न डगमगता आपण ठामपणे उभे राहून प्रतिकार करू तेव्हाच कॅन्सरसारख्या आजाराबद्दलची भीती लोकांमधून नाहीशी होईल. याच भावनेने नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

470 बेडचे सूसज्ज रुग्णालय

डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेद्वारे स्थापित नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट हे 470 बेड क्षमता असणारे 25 एकरवर पसरलेले हॉस्पिटल प्रामुख्याने कर्करोगावर उपचारासाठी आहे. स्वयंसेवी संस्थेद्वारे हे हॉस्पिटल चालवले जात आहे. 28 फेब्रुवारी 2015 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संस्थेचे भूमिपूजन करण्यात आले. पहिल्या टप्प्याचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या हस्ते 2017 मध्ये नागपुरातच करण्यात आले होते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news