नागपूर : उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विश्वविक्रमी अहिंसा दौडचा समारोप | पुढारी

नागपूर : उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विश्वविक्रमी अहिंसा दौडचा समारोप

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सेंट उर्सूला हायस्कूल येथे आयआयएफएल जितो अहिंसा दौडचा समारोप करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दौड स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यावेळी उपस्थित होते.

जगातील 23 देशांमध्ये अहिंसेची शपथ घेत या अहिंसा दौडचे आयोजन करण्यात आले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या अनोख्या दौडची नोंद करण्यात आली. जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या महिला शाखेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उपमुख्यमंत्री म्हणाले की, भगवान महावीर यांनी अहिंसेचा मंत्र समस्त मानव जातीला दिला. सर्वांना जगण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी आपल्या तत्वज्ञानातून सांगितले. भगवान महावीर यांचे अहिंसेचे तत्वज्ञानच आज जगाला वाचवू शकतात. अहिंसा दौडच्या माध्यमातून अहिंसेची शपथ घेत आज आपण शांततापूर्ण मार्गावर चालण्याची शपथ घेतली असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

भगवान महावीर यांच्या तत्वज्ञानाबरोबरच या समाजाचे गोसेवा ते मातृ सेवेपर्यंतचे कार्य प्रशंसनीय आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार केल्यास जैन समाजाच्या योगदानाशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही. अनेक सामाजिक उपक्रम, कार्य हे जैन समाजाच्या माध्यमातून पूर्णत्वास आले असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button