नव्या शैक्षणिक धोरणात मराठी ज्ञानभाषा होणार : देवेंद्र फडणवीस

नव्या शैक्षणिक धोरणात मराठी ज्ञानभाषा होणार : देवेंद्र फडणवीस
Published on
Updated on

वर्धा; पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी ज्ञानभाषा होण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करू शकलो नाही. नव्या पिढीचा ओढा मराठीकडे कमी झाला आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या नव्या शैक्षणिक धोरणात वैद्यकीय, तंत्र आणि सर्व प्रकारचे शिक्षण मराठीतून देऊ शकणार आहोत. त्यामुळे ज्ञान व्यवहारात मराठीचा समावेश होईल आणि ती ज्ञानभाषा होईल. मराठीबाबातची चिंता आता दूर होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.५) व्यक्त केला.

वर्धा येथील महात्मा गांधी साहित्य नगरीत सुरु असलेल्या ९६ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अखेरच्या दिवशी शुभारंभाच्या सत्रात ते बोलत होते. यावेळी खा. रामदास तडस, खा. डॉ. अनिल बोंडे, आ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, आ. समीर मेघे, माजी आ. सागर मेघे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष व संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रदीप दाते, अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष उषा तांबे, डॉ. उज्वला मेहेंदळे, विलास मानेकर, गजानन नारे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मराठीमध्ये साहित्य संमेलनाची उज्वल अशी परंपरा आहे. मराठीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, विविध विचारांची साहित्य संमेलने उत्साहात पार पडतात. साहित्य संमेलने ही उणिवांवर बोट ठेवण्यासाठी नव्हे तर जाणीवा समृद्ध करणारे असते. वर्तमानात नवनिर्मित साहित्याला सोशल मीडियाची भरपूर साधने उपलब्ध असली तरी ती उंची आणि खोली नाही. मात्र भविष्यात ती मिळेल, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित ९६ व्या साहित्य संमेलनाची स्मरणिका 'वरदा' चे प्रकाशन त्यांच्या हस्ते केले. प्रास्ताविक प्रदीप दाते यांनी केले, तर संचालन रेणुका देशकर यांनी केले.

विदर्भ साहित्य संघाला १० कोटी

विदर्भ साहित्य संघाने मराठी साहित्य आणि साहित्यिकांचे संवर्धन करण्याचे कार्य स्वातंत्र्यपूर्व काळापासून केले आहे. शताब्दी वर्षानिमित्त शासनाकडून १० कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.

आम्ही राजकारणी साहित्यिकांची प्रेरणा

साहित्याच्या व्यासपीठावर राजकारणी कशाला, असा आक्षेप नेहमी घेतला जातो. मात्र, आम्ही राजकारणी साहित्यिकांची प्रेरणा आहोत. अन्यथा व्यंगचित्रकारांना देखील काय काम? आमच्यातही स्क्रिप्ट लिहिणारे, स्टोरी करणारे भरपूर आहेत. सकाळी टीव्ही लावल्यावर जे साहित्य राजकारण्यांच्या तोंडून ओसंडून वाहताना दिसते, त्यावरून आम्ही साहित्यिक नाही, असे कुणी म्हणू शकत नाहीत. आमच्यातही बरेच साहित्यिक आहेत. आम्हीच साहित्यिकांची प्रेरणा आहोत आणि म्हणून व्यासपीठावर मिळणारी लहानशी जागा सुद्धा आम्ही व्यापून घेतो, असे फडणवीस यांनी खास शैलीत चिमटे काढले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news