नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले १०० क्षय रुग्णांचे पालकत्व | पुढारी

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले १०० क्षय रुग्णांचे पालकत्व

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत २०२५ पर्यंत ‘क्षयरोग मुक्त भारत’ करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या अनुषंगाने आतापर्यंत नागपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ७७० क्षय रुग्णांना पोषण कीट वितरित करण्यात येत असून, याकरिता ४९ निक्षय मित्रांची नोंदणी झालेली आहे. हे निक्षय मित्र मनपा कार्यक्षेत्रातील २७११ क्षय रुग्णांना सहयोग करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही १०० रुग्णांचे पालकत्व स्वीकारले आहे.

विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने नागपुरातला क्षयरोगमुक्त करण्याचा निर्धार महानगरपालिकेने केला आहे. क्षयरुग्णांना उत्तम औषध उपचाराच्या सुविधेसोबतच पोषण आहार मिळाल्यास क्षयरोग बरा होऊ शकतो. यासाठी नागरिकांनी व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत क्षयरोग बाधित रुग्णांचे पालकत्व घेण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिकेने केले आहे. यातच नागपूर शहरातील एकूण ४९ निक्षय मित्रांची नोंदणी करण्यात आली आहे. या ४९ निक्षय मित्रांपैकी २३ निक्षय मित्र हे महानगरपालिका येथील वैद्यकिय अधिकारी व इतर अधिकारी, कर्मचारी यांच्यासह राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातील कंत्राटी दोन वैद्यकिय अधिकारी व तीन कर्मचारी आहेत. तर उर्वरित निक्षय मित्र हे मोठे उद्योगपती व स्वयंसेवी संस्था आहेत.

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत धरमपेठ झोन अंतर्गत क्षयरुग्णांना लागणाऱ्या पौष्टिक आहाराचे कीट वाटप करण्यात आले. सहा. आयुक्त प्रकाश वराडे व झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे यांच्या हस्ते धरमपेठ झोनमधील पाच टीबी रुग्णांना पोषण आहार कीटचे वाटप करण्यात आले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली चार निक्षय मित्रांचा सत्कार करण्यात आला. यात पगारीया ग्रुपचे संचालक उज्वल पगारीया, स्व. प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुभाष राऊत, सहयोग फांउडेशनचे अध्यक्ष धनवाईन, सचिव संजय सपेलकर यांचा समावेश होता.

हेही वाचा :

Back to top button