

पुढारी ऑनलाईन डेस्क : अधिवेशनाचा पाचवा दिवस; पण कर्नाटकविरोेधात ठराव का नाही? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गप्प का? असे प्रश्न करत सरकारला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी धारेवर धरले. आज ते माध्यमांशी बोलत होते. आज सकाळी १० वाजता विरोधी पक्षातील पक्षनेत्यांची बैठक घेऊ, असेही ते म्हणाले. (Ajit Pawar News)
राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत आहे. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. अधिवेशन सुरु झाल्यापासून हे अधिवेशन चर्चेत आहे. आज (दि.२२) माध्यमांशी बोलत असताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, " सीमावादावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याविरोधात ठराव केला आहे. अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. पण अद्याप आपल्या सरकारने कर्नाटकविरोधात ठराव का नाही? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गप्प का? असा प्रश्न करत अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरलं. पुढे ते असेही म्हणाले की, जयंत पाटील यांनी सभा अध्यक्षांना 'निर्लज्ज' हा शब्द वापरलेला नाही. या अगोदरही अनेकांनी असे शब्द वापरले आहेत. छगन भुजबळांनी मुंबईबाबत वापरलेले शब्द यापूर्वी वापरले आहेत. सरकारचे लोक बोलले तर विरोध नाही आणि विरोधी पक्षातील लोक बोलले की विरोध. असे सोयीचे राजकारण केले जात आहे. हे बरोबर नाही, हा कोणता न्याय, असे म्हणत त्यांनी सरकराच्या दुटप्पी वागण्यावर आक्षेप घेतला.
आमदार निवासस्थानातील गैरसोयीबद्दल बोलत असताना ते म्हणाले, "सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील लोकांनी समजुतीने वागायला हवे, जो पैसा खर्च केला जातो तशी सर्विस पण हवी. सरकराने याबाबत कडक भूमिका घेतली पाहिजे. सरकराचा जो वचक असायला हवा तो दुर्दैवाने नाही आहे." सत्ताधारी आणि विरोधीपक्षातील नेत्यांनी समजुतीने घ्यायला पाहिजे. महागाई, बेरोजगार यासारख्या महत्वाच्या प्रश्ना ऐवजी, चर्चेला बगल देऊन दुसऱ्याच विषयावर बोललं जात आहे. असेही ते म्हणाले.
आज सकाळी १० वाजता विरोधी पक्षातील पक्षनेत्यांची बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा