मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी केंद्राने उपाययोजना कराव्यात : किशोर जोरगेवार | पुढारी

मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी केंद्राने उपाययोजना कराव्यात : किशोर जोरगेवार

चंद्रपूर पुढारी वृत्तसेवा : जंगल व जंगली प्राण्यांचे संवर्धन करत असताना मानवाला मोठी किंमत चुकवावी लागत आहे. याच जिल्ह्यात जगप्रसिध्द ताडोबा अभयारण्य आहे. येथे वाघांची संख्याही लक्षणीय आहे. मात्र याच जंगलातून प्राणी मानवी वस्त्यांमध्ये शिरत असल्याने मानव व वन्यजीव संघर्ष वाढला आहे. त्यामुळे वाघांची संख्या वाढत असतांना मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी केंद्राने पुढाकार घेवून उपाय योजना कराव्यात. जेणेकरून मानवासाठी वाघ शाप नाही तर वरदान ठरेल. अशी मागणी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी पर्यावरण, वने आणि हवामान बदल केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय राज्यमंत्री अश्वीनीकुमार चौबे यांची भेट घेऊन केली आहे.

जागतिक व्याघ्र दिनानिमित्त राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या वतीने वन प्रबोधनी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पर्यावरण, वने आणि हवामान बदल केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय राज्यमंत्री अश्वीनीकुमार चौबे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमादरम्याण आमदार किशोर जोरगेवार यांनी केंद्रीयमंत्र्यांची भेट घेत सदर मागणी केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यावर निर्सगाची नेहमी कृपा राहिली आहे. हा जिल्हा वन संपत्तीने संपन्न जिल्हा आहे. येथील वनांचे संरक्षण स्थानिक नागरिकांनी केले आहे. त्यामुळे येथील वनसंपत्ती कायम राहिली आहे. चंद्रपुरातील जंगलाची वाघांचे जंगल म्हणून जगात ओळख निर्माण झाली आहे. येथील वाघांची संख्या आणखी वाढत आहे. मात्र याचे काही वाईट परिणामही मानवाला भोगावे लागत आहेत. जंगली हिंस्त्र वन्य प्राणी नागरी वस्त्यांमध्ये शिरत असल्याने जिल्हात मानव आणि वन्यजीव संघर्ष वाढला आहे. वाघांचे संवर्धन करणे हे योग्यच आहे. मात्र मानवांचेही संरक्षण करणे ही, ही आपली जबाबदारी आहे. राज्य सरकारच्या माध्यमातुन आम्ही या दिशेने प्रयत्न करत आहोत मात्र आता केंद्राचीही मदत अपेक्षित आहे. जंगलालगत असणा-या गावांमध्ये सुरक्षा भिंत बांधण्यासोबतच विविध उपायोजनांसाठी केंद्राने मदत करण्याची मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.

हेही वाचा

Back to top button