चंद्रपूर : रोप लावणीला गेले अन् पुरात अडकले; रात्रीपासून झाडावरच आश्रय!
चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चिमूर तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसाने उमा नदीला आलेल्या पुरात विविध ठिकाणी सुमारे 20 नागरिक अडकले आहेत. रविवारी खातोडा (वडसी) शेतात ट्रॅक्टर घेऊन भात लावणीसाठी गेलेले पाच शेतकरी पुरात अडकले आहेत. त्यापैकी काही जण ट्रॅक्टरच्या टपावर तर काहींनी झाडाचा आश्रय घेतला आहे. जिल्हा प्रशासनाकडून बोट पाठविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले असले तरी घटनास्थळी कोणतेही बचावकार्य सुरू नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, नेरीपासून १ कि. मी. अंतरावरील हबिबखॉ दर्ग्यात पुरामुळे सुमारे २० नागरिक अडकले आहेत. त्यांना बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
चिमूर तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसाने उमा नदीला महापूर आलेला आहे. अनेक मार्ग बंद झाले आहेत तर अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेली आहे. अनेक गावांत पूराचे पाणी घरांमध्ये शिरल्याच्या घटना आहेत. खातोडा (वडसी) येथील पाच शेतकरी रविवारी रात्री भात लावणीसाठी ट्रक्टर घेऊन शेतात गेले होते; पण परतताना पाणी पातळीत वाढ झाल्याने पूरात अडकले आहेत. जीव वाचवण्यासाठी हे शेतकरी झाडावर चढून बसले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून बोट पाठविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले असले तरी घटनास्थळी कोणतेही बचावकार्य सुरू नसल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा :