चंद्रपूर शहरातील ५९१ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले | पुढारी

चंद्रपूर शहरातील ५९१ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर शहराला लागून असलेल्या इरई धरणाचे सातही दरवाजे संततधार पावसामुळे उघडले. गेल्या तीन दिवसांपासून दरवाजे उघडण्यात आल्याने शहरातून वाहणारी इरई नदी चांगलीच भरली आहे. त्यामुळे शहरातील अनेक वार्डात पुराचे पाणी घुसले आहे. परिणामी नागरिकांची घरे पाण्याखाली गेल्याने त्यांना रेस्क्यू करू बाहेर काढण्यात येत आहे. महापालिका आपत्ती व्यवस्थापन टीमद्वारे चंद्रपूर शहराच्या पूरग्रस्त भागातील ५९१ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.

चंद्रपूर शहराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात संततधार मुसळधार पाऊस कोसळ्याने धरणात पाण्याचा साठा वाढून धरणाचे सातही दरवाजे सध्या सुरू आहेत. त्यामुळे चंद्रपूर शहरातील रहमत नगर, सिस्टर कॉलोनी, राष्ट्रवादी नगर, तुलसी नगर, ठक्कर कॉलोनीतील बहुतांश घरे पाण्याखाली आहेत. दरवर्षीच पुरामुळे या भागाला पुराचा फटका बसतो.

नागरिकांना बाहेर आश्रय घ्यावा लागतो. इरई नदीचे पाणी शहरातील या वार्डात शिरले आहे. महानगर पालिका प्रशासनाच्या आपत्ती चमूव्दारे त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याठी रेस्क्यु ऑपरेशन राबविण्यात येत आहे. आतापर्यंत पूरग्रस्त भागातील ५९१ नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

मनपाच्या महाकाली कन्या शाळा येथे ११४, माना प्राथमिक शाळा येथे ८०, शहीद भगतसिंग शाळा येथे ३५, महात्मा फुले शाळा येथे २१६, किदवई शाळा येथे ८५ ज्येष्ठ नागरिक संघ येथे ४६ तर अग्रसेन भवन येथे १५ नागरिकांना ठेवण्यात आले आहे. त्यांची व्यवस्था व देखभाल करण्यात येत आहे. पूरपरि.िस्थतीशी लढण्यास महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन टीम सतर्क झालेली आहे. पुराचे पाणी घुसलेल्या वॉर्डातून नागरिकांना बाहेर काढण्याची मोहीम रात्रीपासून सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा : 

Back to top button