गडचिरोली : ७५ वर्षीय वृद्धेचा उष्माघाताने मृत्यू
गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : अहेरी तालुक्यातील ७५ वर्षीय वृद्धेचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. लचुमबाई बोंदा कोडापे, रा.वट्रा (बु) ता.अहेरी असे मृत वृद्धेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी घडली.
लचुमबाई कोडापे ही श्रावणबाळ योजनेची लाभार्थी आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना तलाठ्याकडून जिवंत असल्याचे प्रमाणपत्र घेऊन आधार कार्ड, राशन कार्ड आणि बँक पासबूक घेऊन तहसील कार्यालयात ओळख परेडसाठी जावे लागेल, असे एकाने सांगितले. त्यानुसार ती सोमवारी दुपारी टॅक्सीमधून २५ किलोमीटर अंतरावरील अहेरी येथे गेली. तेथून ती संध्याकाळी गावी परत आली. मंगळवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. तिचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचा अंदाज काही गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांना विचारणा केली असता त्यांनी आपण दोन दिवसांपासून पुण्यात प्रशिक्षणासाठी असून, आपणास या घटनेची कल्पना नसल्याचे सांगितले.
हेही वाचलंत का ?