

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : वीज पुरवठ्याला संतापलेल्या शेतक-यांनी शुक्रवारी (दि.15) सिहोरा येथील महावितरणच्या कार्यालयासमोर चार तास ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तब्बल चार तासांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
शेती कृषीपंपाना नियोजित वेळेत 8 तास थ्री फेज विज कपात करण्यात येते. आणि 4 तास थ्री फेज विज पुरवठा केला जाताे. यातही 10 ते 12 वेळेस ब्रेकडाऊन होत असल्याने शेती ओलीत होत नाही. पाण्याविना पीक जळण्याच्या मार्गावर आहेत. तर जमिनीला भेगा पडल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत थ्री फेज विज पुरवठा होत असल्याने शेतक-यांना वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची भीती आहे. वीज पुरवठ्यात भारनियमन येत असल्याने शेतक-यांना रात्र जागून काढावी लागते. पिकांना पाण्याची गरज असताना 8 तासही थ्री फेज वीज पुरवठा करण्यात येत नाही.
जिल्हा परिषद सदस्य रमेश पारधी यांचे नेतृत्वात सिहोरा वीज वितरण कार्यालयात सकाळी 11 वाजता शेतक-यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी माजी सभापती कलाम शेख, माजी सरपंच छगणलाल पारधी, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र ढबाले, पंचायत समिती सदस्य सुभाष बोरकर, हिरालाल नागपुरे, कंचन कटरे, सरपंच गळीराम बांडेबूचे, किशोर रहांगडाले, सुखदेव राऊत, विनोद पटले, सरपंच सहादेव ढबाले, रवी बोपचे, राधेश्याम ढबाले, संतोष बघेले, रामकृष्ण बनकर, माजी सरपंच सुरेश जटाळे, गोपाल येळे,नंदलाल पटले, आलकेश ढबाले, विकास खरवडे, आदी उपस्थित होते.
शेतक-यांनी तब्बल चार तास दारातच ठिय्या आंदोलन केले आणि कार्यलयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान शिष्टमंडळासोबत उपविभागीय अभियंता चर्चेसाठी आले. त्यांनी वरिष्ठासोबत चर्चा केल्यानंतर नियोजित वेळेत 8 तास थ्री फेज वीज पुरवठा करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. यानंतर अघोषित भारनियमन केल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतक-यांनी दिला.
हेही वाचा