चंद्रपूर : हत्तीच्या गुजरात स्थानांतरास वन संरक्षकांचा विरोध; वनविभागाला दिले पत्र | पुढारी

चंद्रपूर : हत्तीच्या गुजरात स्थानांतरास वन संरक्षकांचा विरोध; वनविभागाला दिले पत्र

चंद्रपूर,पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर आणि गडचिरोली येथील १३ हत्तींचे स्थानांतरण राज्यातील जामनगर येथे करण्याचे मुख्य प्रधान वन संरक्षकांनी एका लेखी आदेशान्वये वनविभागाला दिलेले आहेत. या स्थानांतरणास गडचिरोली येथील वन्य  जीव अभ्यासक, राजकीय, सामाजिक संस्थां यांनी विरोध केल्यानंतर चंद्रपुरातही हत्तींच्या स्थानांतरणास प्रचंड विरोध करण्यात आला आहे.  येथील वन्य जीव  अभ्यास, ग्रीन प्लानेट सोसायटीच्या वतीने  मुख्यमंत्री  उध्दव  ठाकरे,  प्रोजेक्‍ट एलेफंट डिव्‍हीजन आणि सेन्ट्रल झू ॲथोरीटी ह्यांना पत्र पाठवून स्थानांतरणाला विरोध दर्शविला असून काही सूचनाही केल्या आहेत.
प्रधान मुख्य वन संरक्षक,महाराष्ट्र राज्य ह्यांनी, २३ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या पत्रानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबाचे क्षेत्र संचालक आणि गडचिरोलीचे वन संरक्षक यांना१३ हत्तींचे स्थानांतरण जामनगर,गुजरात च्या राधेकृष्ण टेम्पल वेल्फेअर ट्रस्ट ला सुपूर्द करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश देताना त्यांनी  प्रोजेक्ट एलेफंट डीविझन,केंद्रीय पर्यावरण मंत्रालय दिल्ली, सेन्ट्रल झु एथोरीटी,केंद्रीय वन,पर्यावरण मंत्रालय, दिल्ली, राधाकृष्‍ण टेम्पल एलेफंट वेल्फेअर ट्रस्ट,गु जरात आणि महाराष्ट्र शासनाचे पत्रांचा १३ हत्ती स्थानांतरण करण्यासाठी संदर्भ देण्यात आला आहे.
राज्य वन्यजीव विभागाच्‍या मते हे सर्व हत्ती निरुत्पादक आणि अप्रशिक्षित आहेत. वृत्तपत्रांना दिलेल्या मुलाखतीत वन्यजीव विभाग प्रमुखांनी, महाराष्ट्रात ताडोबा आणि गडचिरोली येथे हत्तींची काळजी घ्यायला, त्यांना खायला वनविभागाकडे पैसे नाहीत, त्यांची काळजी घ्यायला पुरेसे कर्मचारी नाहीत, असे म्हटले आहे.
वन्यजीव विभागाचे आदेशानंतर गडचिरोली आणि चंद्रपूर येथील वन्यजीव अभ्यासकांनी, सामाजिक आणि राजकीय संस्थांनी,गडचिरोली पत्रकार संघाने येथील हत्ती स्थानांतरीत करू नका, अशी मागणी केली आहे. तसेच चंद्रपूर येथील ग्रीन प्लानेट सोसायटी  सदस्य, पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्रात कार्य करणारी नॉन प्रोफिट संस्था म्हणून संरक्षणाचे कार्य करित आहेत. या संस्थेने चंद्रपूर-गडचिरोली येथील हत्ती स्थानांतरणास विरोध केला आहे. तसेच काही सूचना केल्या आहेत.

चंद्रपूर-गडचिरोली येथे नैसर्गिक अधिवास

नैसर्गिक अधिवास-प्राचीन काळापासून गडचिरोली, चंद्रपूर आणि विदर्भ हा हत्तींचा मूळ अधिवास आहे. गोंड राज्यांचे राजचिन्हावर हत्ती आहे. इतर राज्यांच्या काळात येथील रानटी हत्तींचा युद्धात उपयोग होत असे. अधून मधून गडचिरोलीत जंगली हत्ती येत असतात. त्यामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली येथील पाळीव हत्ती ह्या अधिवासात सुरक्षित राहू शकतात.हे हत्ती महाराष्ट्रातील वनात असणे ही अभिमानास्पद बाब त्यामुळे त्यांना इथेच नैसर्गिक अधिवासात राहू द्यावे, अशी मागणी गडचिरोली आणि चंद्रपूर येथील वन्यजीव अभ्यासकांनी, सामाजिक आणि राजकीय संस्थांकडून हाेत आहे.

हत्तींमुळे पर्यटनाला संधी

गडचिरोली येथे १९६२ साली जिल्ह्यात वन विभागाच्या कामासाठी हत्ती कॅम्प स्थापन करण्यात आला होता. इतका सुंदर आणि मोठा प्राणी अलीकडे हत्तींचे काम नसल्याने वन विभागाला नकोसा झाला आहे हे दुर्दैव; परंतु जेव्हापासून हत्ती केम्प मध्ये हत्ती आहेत तेव्हापासून इथे विदर्भातील आणि तेलंगणातील नागरिक हत्ती पर्यटनाला येथे येत असतात. इथे पर्यटन विकास केला तर हत्तीसाठी पुरेसे मनुष्यबळ आणि आर्थिक मदत सहज उपलब्ध होऊ शकते.
चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा हे जसे वाघांसाठी प्रसिद्ध आहे तसेच हत्ती पाहण्यासाठी सुद्धा पर्यटक उत्सुक आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील मोठे जंगल पाहता आदिवासी विकास करायचा असेल तर जिल्ह्यात व्याघ्र  प्रकल्प, हत्ती पार्क आणि अभयारण्य घोषित केले पाहिजे. पर्यटनातून येणाऱ्या पैशावर हत्तींचे संरक्षण,कर्मचारी आणि ओषध उपचार सहज करता येईल, असे तज्‍ज्ञांचे मत अआहे.

नक्षलवादाकडून विकासाकडे

गडचिरोली येथील नागरिक अनेक वर्षापासून नक्षल समस्येमुळे त्रस्त होते तसेच येथील लोक वण्यजीव संरक्षणाप्रती फारसे उत्सुक नव्हते.परंतु हत्तीच्या संरक्षणासाठी जिल्ह्यातील आणि कमलापुरचे सर्व आदिवासी आणि नागरिक एकत्र आले आणि त्यांनी स्थानांतरणास विरोध दर्शविला. स्थानिक नागरिकांचे हत्ती आणि वन्यजीव प्रेम पाहून ह्या संधीचा उपयोग करून येथील सर्व हत्ती येथेच राहू द्यावे.

वन्य जीव मानव संघर्ष कमी होईल

गडचिरोलीत वन्यजीवांच्या सर्वाधिक शिकारींच्या घटना घडतात.परंतु वनविभागाच्या सतर्कतेने आणि लोकांच्या जागरूकतेने येथील घटना कमी होऊन लोकांना वण्यजीवाचे संरक्षण करून पर्यटन विकास व्हावा असे वाटू लागले .ताडोबा,आलापल्ली आणि सिरोंचा वन विभागात पर्यटक आणि आदिवासी हत्ती पाहण्यासाठी येवू लागले आहेत .आज येथील हत्तांचे स्थानातरण होताना सर्व ग्रामीण,आदिवासी ,नागरिक आणि वन्यजीव संस्था एकत्र येवून विरोध करू लागल्या आहेत. हत्तीच्या निमित्ताने गडचिरोली सारख्या आदिवासी भागात हत्ती आणि वण्यजीवासाठी प्रेम पाहून येथील हत्ती येथेच संरक्षित ठेवल्यास येथील पर्यटन वाढेल आणि वन्यजीव मानव संघर्ष कमी होण्यास मदत होईल, असेही मत व्‍यक्‍त हाेत आहे.

खासगी संस्थेला हत्ती का द्यावे?

हत्ती हे वनविभागासाठी अभिमानास्पद असताना शासनाने हत्ती आर्थिकदृष्ट्‍या परवडत नाही म्हणणे ही बाब लाजिरवाणी आहे. त्यातही हत्ती एका खासगी प्राणी संग्रहालयाला देणे हेसुद्धा योग्य नाही .ज्या राज्यात जास्त हत्ती आहेत ते संबंधितांना देती. महाराष्ट्र शासनाने हे हत्ती चंद्रपूर,गडचिरोली जिल्ह्यातच ठेवून त्यांचा वन विभागाच्या कामासाठी तसेच पर्यटनासाठी उपयोग करावा.

हत्ती महाराष्ट्रांला अभिमान

हत्ती सारख्या भव्य आणि दिमाखदार प्राणी महाराष्ट्रात असणे ही अभिमानाची बाब आहे,ते उपयोगाचे नाही ,कामाचे नाही, वृद्ध आणि आजारी असतात असे वन्य जीव विभागाने म्हणणे योग्य नाही उलट ह्या ह्या हत्तींचा वन विभागाच्या कामात आणि पर्यटनासाठी निश्चित उपयोग करून घ्यावा. गडचिरोली जिल्यातील हत्तीना इतर राज्यात,खासगी संस्थेला, प्राणी संग्राहलयात बंदिस्त ठिकाणी नेण्यास आमचा विरोध असून ते हत्ती इथेच नैसर्गिक वातावरणात ठेवावे,त्यातून पर्यटन विकास करावा आणि हत्तींचे शासनाच्या वतीने संवर्धन व्हावे. अशी मागणी ग्रीन प्लानेट सोसायटीच्या वतीने करण्यात आली आहे.
हेही वाचलं का?   

Back to top button