Wardha Accident : बर्थडे सेलिब्रेशनसाठी गेले अन् 'ते' परतलेच नाहीत! सात भावी डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू
वर्धा; पुढारी वृत्तसेवा
वर्ध्याकडे परत येत असताना अनियंत्रीत कार पुलाच्या संरक्षक भिंतीवरून नदीत कोसळून (Wardha Accident) सात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यवतमाळ – वर्धा मार्गावर सेलसुरा येथील भदाडी नदीच्या पुलावर मध्यरात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. सातही जण सावंगी (मेघे) येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. मृतांमध्ये गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा येथील आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार रहांगडाले याचा समावेश आहे. मित्राच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे सात जण यवतमाळला गेले होते, अशी माहिती आहे.
सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाअंतर्गत जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजचे सात विद्यार्थी बाहेरगावी गेले होते. हे सातही विद्यार्थी ओडी २३ बी १११७ क्रमांकाच्या कारने यवतमाळकडून वर्ध्याकडे परत येत होते. दरम्यान, सेलसुराजवळ कार चालविणार्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पुलाच्या संरक्षक भिंतीला लागून नदीपात्राच्या कोरड्या भागात आदळली. त्यामध्ये सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच सावंगी पोलिसांनी घटनास्थळ गाठून बचावकार्य सुरू केले. जवळपास चार तास याकरिता पोलिसांना लागल्याची माहिती आहे. या भीषण अपघातात सातही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिस अधिकारी, कर्मचारी रुग्णालय प्रशासनाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतांमध्ये गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा येथील आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार रहांगडाले याचा समावेश आहे. या दुर्दैवी घटनेत नीरज चौहाण रा. गोरखपूर (उत्तरप्रदेश) एमबीबीएस प्रथम वर्ष, नितेश सिंग रा. ओडिशा इंटर्न एमबीबीएस, विवेक नंदन रा. गया (बिहार) एमबीबीएस अंतिम वर्ष भाग १, प्रत्यूष सिंग रा. गोरखपूर (उत्तर प्रदेश) एमबीबीबीएस अंतिम वर्ष भाग २, शुभम जयस्वाल रा. दिनदयाल उपाध्याय नगर (उत्तर प्रदेश) एमबीबीएस अंतिम वर्ष भाग २, पवन शक्ती एमबीबीएस अंतिम वर्ष भाग १ गया (बिहार) यांचा मत्यू झाला. याप्रकरणी सावंगी (मेघे) पोलिसांनी नोंद केली. जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू होती.
Wardha Accident : अपघातस्थळ शोधण्यास काही वेळ
सावंगी (मेघे) पोलिसांना अपघात स्थळ शोधण्यास जवळपास काही वेळ लागल्याचे सांगण्यात आले. सावंगी पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळाकडे धाव घेतली. वाहन खाली कोसळल्याने सुरूवातीला दृष्टीपथास येत नव्हते. पुलाच्या खाली बघितले असता, पोलिसांना पुलाखाली वाहन पडल्याचे दिसले. पोलिसांनी लागलीच धाव घेऊन वाहनात असलेल्यांना बाहेर काढले.
सहाजण राहायचे होस्टेलमध्ये
अपघातात मृत्यू झालेल्या सात जणांपैकी सहा जण होस्टेलला राहायचे. एक जण बाहेर रुम करून राहायचा. सोमवारी २४ जानेवारी रोजी सायंकाळी हे सगळे यवतमाळकडे गेले होते.
घटना दुर्दैवी : अभ्युदय मेघे
सातपैकी एका विद्यार्थ्याचा वाढदिवस होता. तो साजरा करायला गेले होते. होस्टेल प्रशासनाला लवकर येत असल्याचे सांगून ते बाहेर गेले होते. रात्री दहा वाजता होस्टेलवर विद्यार्थ्यांची हजेरी घेतली असता सहा विद्यार्थी आलेले नव्हते. याबाबत त्यांच्या पालकांना माहिती देण्यात आली होती. रात्री या घटनेची माहिती मिळाली. ही दुर्दैवी घटना आहे. यातील एक विद्यार्थी इंटर्नशिप करीत होता. पुढील काळजीच्या अनुषंगाने रुग्णालय प्रशासनाकडून उपाययोजनांबाबत बैठकीत निर्णय घेण्यात येईल. बाहेर राज्यातील विद्यार्थ्यांचे मृतदेह कुटुंबीय आल्यानंतर त्यांच्या स्वाधीन करण्यात येईल. त्याकरिता रुग्णालय प्रशासन सहकार्य करत असल्याचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे यांनी सांगितले.
जेसीबीच्या साहाय्याने वाहन बाजूला काढले
पोलिसांनी पोलिस पाटील, गावकरी यांना बोलावून जेसीबीच्या साहाय्याने वाहन बाजूला काढण्यात आले. वळणावर वेग जास्त असल्याने हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त
दरम्यान, सेलसुरा येथील अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून सेलसुरा जवळ झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपयांची तर या अपघातात जखमी झालेल्यांना प्रत्येकी ५० हजारांची मदत देण्याची घोषणा केली आहे.
हे ही वाचा :
- Budget २०२२ : अर्थमंत्री सीतारामन १ फेब्रुवारीला सादर करतील चौथा अर्थसंकल्प, जाणून घ्या काय असेल खास?
- कोरोनानंतर बदलला पर्यटनाचा ट्रेंड; छोट्या ग्रुपची चलती
पंतप्रधान @narendramodi यांनी पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून सेलूसरा जवळ झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर या अपघातात जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.
— PMO India (@PMOIndia) January 25, 2022
महाराष्ट्रात सेलुसरा येथील अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे तीव्र दुःखी झालो आहे. ज्यांनी आपल्या जवळच्यांना गमावले आहे त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. या अपघातातील जखमींना लवकर बरे वाटावे यासाठी मी प्रार्थना करतो: पंतप्रधान @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 25, 2022
PM @narendramodi announced that Rs. 2 lakh each from PMNRF would be given to the next of kin of those who have lost their lives in the accident near Selsura. Those who are injured would be given Rs. 50,000.
— PMO India (@PMOIndia) January 25, 2022