

सुनील जगताप
पुणे : कोरोनामुळे परदेशवारीवर निर्बंध आले असून, त्याचा फायदा देशांतर्गत पर्यटनाला होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामध्येही मोठ्या ग्रुपऐवजी छोट्या ग्रुपची अथवा कौटुंबिक पर्यटनाची संख्या वाढत चालली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी देशांतर्गत पर्यटनामध्ये तब्बल 30 ते 35 टक्क्यांनी वाढ झाली असून, पर्यटनाचा ट्रेंडही बदलत चालल्याचे दिसून येत आहे.
भारतीय जीडीपी वाढीसाठी पर्यटनाचे असलेले महत्त्व लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी हा राष्ट्रीय पर्यटन दिन साजरा केला जातो. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत पर्यटनाला मोठा फटका बसला. परदेशी पर्यटन घटले असले तरी देशांतर्गत पर्यटनाची मागणी वाढलेली आहे. त्याचबरोबर 30 ते 50 जणांच्या ग्रुपने जाणार्या पर्यटकांमध्ये ही आता छोट्या छोट्या ग्रुपनेच जाण्याचा कल असून कुटुंबासह पर्यटनाला जाणार्यांची संख्याही वाढल्याचे दिसून आले आहे.
कोरोनापूर्वी परदेशात जाणार्यांची संख्या 70 ते 75 टक्के तर देशांतर्गत पर्यटकांची संख्या 25 टक्के होती. कोरोनानंतर यावर्षी परदेशातील पर्यटन बंद असल्याने ते केवळ 5 टक्के असून देशांतर्गत पर्यटन तब्बल 95 टक्के वाढलेले आहे.
कोरोनामुळे पर्यटनाला फटका बसला आहे. गेल्या तीन वर्षांतील जीएसटी रिटर्नमध्ये केंद्र सरकारकडू दिलासा मिळणे अपेक्षित आहे. अनेकांनी जीएसटी रिटर्न भरला असला तरी त्यावरील अधिभार मात्र भरणे अशक्य आहे. सध्या वयस्कर पर्यटक धार्मिक तर तरुण पर्यटक निसर्ग पर्यटनाकडे वळताना दिसतात. मेघालय, आसाम, अरुणाचल प्रदेश, भुवनेश्वर, पुरी, राजस्थान, गुजरात आदि ठिकाणांना पसंती आहे. कुटुंबाबरोबर 2 ते 3 दिवस छोट्या पर्यटन स्थळांवर जाण्याचा कलही वाढु लागला आहे. महाराष्ट्र टुरिझम मंडळाकडून पर्यटनाला उभारी देण्याबाबत कार्यवाही सुरु असली तरी काही त्रुटी दूर करायला हव्यात.
– नीलेश भन्साळी, संचालक, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ पुणे
सह्याद्री रांग वैभवसंपन्न आहे. साहसी अथवा निसर्ग पर्यटन करणार्या पर्यटकांना विविध पर्याय उपलब्ध आहेत. सह्याद्रीमध्येच विविध प्रकारचे पशु, पक्षी, वृक्ष, विविध गुहा, विविध खडकांच्या जाती पहायला मिळत आहेत. याचा अभ्यास आणि पर्यटनाला अधिक वाव मिळणार आहे. किल्ल्यांवर पर्यटन वाढत असताना त्यांची हानी होताना पण दिसून येते. किल्ले जपणे गरजेचे आहे. गार्डीयन गिरीप्रेमी इन्स्टिटयुटने त्यासाठी वेगवेगळे कोर्स आणले असून त्याचाही या पर्यटनासाठी अधिक फायदा होत आहे.
– उमेश झिरपे, ज्येष्ठ गिर्यारोहक, गिरीप्रेमी
देशांतर्गत युवाशक्तीच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून काम केले जात आहे. संस्थेच्या वतीने सर्वात जास्त हिमालयातील पर्यटनासाठी पुढाकार घेतला जातो. दरवर्षी साधारणतः अडीच ते तीन हजार पर्यटक आमच्या संस्थेबरोबर येत असतात. त्यामध्ये हिमालयामध्ये दोन हजार पर्यटक तर इतर पर्यटन स्थळी 1 हजारच्या आसपास पर्यटक सहभागी होत असतात. यावर्षी नोव्हेंबरपासून हंगाम सुरु झाला असून पहिल्या टप्प्यात 250 पर्यटक सहभागी झाले होते. एप्रिल ते जूनमधील पर्यटनासाठी नाव नोंदणी सुरु असून त्याला ही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
– अमित ओवले, संचालक, युवाशक्ती संस्था