

ठाणे : ज्या प्रकल्पांची मागणीच केली जात नाही. ते प्रकल्प हे सरकार जनतेच्या माथी मारत आहे. ॲमेझाॅनला ठाणेकरांचा विरोध आहे. तरीही तो आणला जात आहे. रिंग मेट्रोची मागणी नसताना तो आणला जात आहे.
ठाणेकरांना बसची कनेक्टिव्हिटी हवी आहे. मात्र, त्याऐवजी हजारो कोटींचा प्रकल्प लादला जात आहे. या प्रकल्पांविरोधात डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशारा राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी दिला.
भिवंडी येथील एका कार्यक्रमाहून परतताना सुप्रियाताई सुळे यांनी ठाणे येथील पक्ष कार्यालयास भेट दिली. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या प्रसंगी डाॅ. जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.
ॲमेझॉन डेटा सेंटर ठाणेकरांच्या माथी मारला जात आहे, त्याविरोधात ठाणेकर रस्त्यावर उतरलेले होते, याबाबत विचारले असता, या विषयावर ठाणेकर मलाही भेटायला आले होते. मी तातडीने स्थानिक खा. नरेश म्हस्के यांच्याशीही संपर्क साधला होता. आम्हाला हा डेटा सेंटर नको आहे.
सगळ्यांचेच म्हणणे आहे, की हे डेटा सेंटर आम्हाला नको, त्याच्यामुळे ठाणेकरांचा जर त्याला विरोध असेल तर हे डेटा सेंटर तिथे येऊ नये, असा निर्णय डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने घेतला आहे. तसेच, रिंग मेट्रोची मागणीच नाही, तरीही हा प्रकल्प लादला जात आहे.
आम्हाला मेट्रो नको त्याच्याऐवजी चांगली बस कनेक्टिव्हिटी द्या. ती बस कनेक्टिव्हिटी होऊ शकली तर पैसे वाचतील. जे काम ५०० रुपयांत होणार आहे, त्याच्यासाठी १ लाख रुपये कशाला खर्च करायचे? पण, या सरकारची खासीयत अशी आहे की, प्रोजेक्ट जेवढा महाग, तेवढा या सरकारला प्रिय असतो. जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, त्याच्यासाठी त्यांच्यासाठी काही पैसे नसतात, असे सुळे म्हणाल्या.