

ठाणे : मध्य रेल्वे मार्गावरील लोकलची संख्या ऐन गर्दीच्या काळात कमी असते. अशी तक्रार नियमित प्रवस करणाऱ्या प्रवाशांची केली आहे. कर्जत-कसारा लाईनवरून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल फेऱ्या अक्षरशः भरलेले असतात. यासाठी मध्य रेल्वेच्या जलद गाड्यांना मुंब्र्यात थांबा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान नवीन रेल्वे मार्गांवर सुद्धा गर्दीच्या वेळेत धिम्या लोकल फेऱ्या चालवाव्यात व दहावी, बारावीची आणि इतर परीक्षार्थींसाठी लोकलचा एक डबा राखीव ठेवावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या मनोज प्रधान यांनी उपस्थित केली आहे.
प्रधान यांनी रेल्वे प्रबंधक कार्यालयात स्टेशन मास्टर अपर्णा देवधर यांची भेट घेतली. दरम्यान, प्रशासनाने रेल्वे अपघात रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिला आहे.
10 फेब्रुवारीला बारावीचा पहिला पेपर होता. परीक्षा देण्यासाठी डोंबिवलीहून निघालेल्या सोहम कठरे या विद्यार्थ्याचा दिवा-मुंब्राच्या मार्गावर लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. दिवसेंदिवस वाढत्या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी रेल्वे प्रशासन काहीसे अपयशी ठरत आहेत. तसेच गर्दीचे नियोजन मध्य रेल्वे प्रशासनाकडून होत नाहीत. असा आरोप देखील राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केला आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सुधीर भगत, नगरसेविका दीपाली भगत, मनिषा भगत या उपस्थित होत्या. तसेच या समस्यांवर मार्ग काढण्याचे आश्वासन देवधर यांनी दिले आहे.
या अगोदर 2025 मध्ये जून महिन्यामध्ये मुंब्रा-दिवा रेल्वे स्थानकादरम्यान अपघात झाला होता. त्यानंतर, सोहम कटरे या मुलाचा मृत्यू वाढत्या गर्दीमुळे झाला आहे. दरम्यान लोकलच्या गर्दीचे प्रमाण जास्त असल्यामुळे कित्येक प्रवासादरम्यान भरपूर हाल सोसावे लागतात. कोपर, ठाकूर्ली, दिवा, मुंब्रा आणि कळवा या स्थानकांवरील प्रवाशांना लोकलमध्ये चढायला नियमित त्रास होत असतो. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची संख्या पाहता लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी होत आहे.
दिवा स्टेशनवरील होम प्लॅटफॉर्मवरून लोकल सुरू करावी आणि मुंब्रा येथून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने शक्य असल्यास मुंब्रा ते छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनस लोकल सुरू करावी आदी मागण्यांचे स्टेशन प्रबंधक अपर्णा देवधर यांना निवेदन देण्यात आले. पत्रकारांशी संवाद साधताना मनोज प्रधान यांनी, मध्य रेल्वेवर वर्षाकाठी 2180 अपघाती मृत्यू होत आहेत. ठाणे स्टेशन परिसरात वर्षाला 287 अपघात होत आहेत. म्हणजेच दररोज सरासरी सात मृत्यू होत आहेत.
परीक्षार्थींसाठी डबा राखीव ठेवण्याची मागणी एसी ट्रेनची गरज असली तरी सलग एसी ट्रेन न चालविता दोन एसी ट्रेनदरम्यान दोन ते तीन साध्या लोकल सोडणे गरजेचे आहे. जेणेकरून गर्दीचा निचरा होणे सोयीचे होणार आहे. मुंब्रा स्टेशन येथे कौसा, शिळपासूनचे लोक येत आहेत. तसेच, आगामी काळात घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची वेळ गर्दीच्या काळातील नसावी, यासाठी विनंती शिक्षण खात्याला करणार असून परीक्षार्थींसाठी एक डबा राखीव ठेवण्यासाठीही रेल्वेकडे आपण मागणी केली असल्याचेही माहिती मनोज प्रधान यांनी माध्यमांना दिली आहे.