कल्याण; पुढारी वृत्तसेवा : गेल्या वर्षात चारवेळा घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली असताना याही वर्षी होळीच्या पूर्वीच घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ झाली आहे. ही दरवाढ आजपासूनच (दि.१) लागू झाल्याने सर्वच विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे यांनीही "अब किस किस सीतम कि मिसाल दु तुमको", तुम तो हर मिसाल बेमिसाल करते हो', या गालिबच्या शायरीतून मोदी सरकारवर निशाणा साधत गॅस दरवाढीवर टीका केली आहे.
घरगुतीसह वाणिज्य वापरातही गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे टपरीवर मिळणाऱ्या चहाचा दर दुप्पट होणार आहे. तर हॉटेलमधील खाद्य पदार्थावरील दरही सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. दुसरीकडे देशाचा विकास दर गेल्या वर्षाच्या तुलनेत आणखी कमी झाल्याने देशात महागाई आणि बेरोजगारी वाढली आहे. मात्र यावर केंद्रातील मोदी सरकार काहीच बोलत नाही, असे तपासे यांनी म्हटले आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना शहरी भागात कमी, तर आदिवासी, ग्रामीण भागातील महिलांचा त्रास कमी व्हावा, धुरा पासून सुटका मिळावी, यासाठी लाभदायवक ठरली होती. मात्र, सततची गॅस दरवाढ आणि सबसिडी बंद झाल्याने महिलांना गॅस बंद करून पुन्हा चुली पेटवू लागल्या आहेत. त्यामुळे उज्ज्वला योजना फोल ठरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सुरुवातीलाच ३५० रुपयांत मिळणारा गॅस आता ११०० रूपये झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक आवाक्याबोहर गेला आहे. त्यामुळे उज्ज्वला योजनेअंतर्गत १०० रुपयांत मिळालेला गॅस आता अडगळीत टाकून वाड्या पाड्यावरील हजारो महिला पुन्हा चुलीकडे वळल्या आहेत.
हेही वाचा