

ठाणे : ऐन हापूस आंब्याच्या हंगामात उष्णतेची मोठी लाट कोकणात सर्वत्र दिसत असल्याने फळ पिकांवर याचा दूरगामी परिणाम होताना दिसत आहेत. याचा परिणाम हापूस आंब्याच्या उत्पादनावर होणार आहे. कोकणात सध्या 38 ते 40 अंशावर तापमानाचा पारा गेला आहे. याचा परिणाम हापूस आंब्याबरोबरच जांभूळ, फणस, करवंद अशा फळपिकांवर होणार आहे.
अलिबागचा पांढरा कांदा, बहाडोली आणि बदलापूरचे जांभूळ, घोलवडचा चिकू ही नामांकित फळ आहेत आणि उष्णतेचा यावर परिणाम होतो आहे. मुंबईकरांची आठवड्याची सुरुवात असह्य उष्णतेने झाली असून सोमवारी दिवसभर उन्हाच्या झळा जाणवत होत्या. सांताक्रूझ येथे पारा 38.4 अंश सेल्सिअसपर्यंत वाढला होता तर कुलाब्यात कमाल तापमानाची नोंद 35.9 अंश सेल्सिअस एवढी होती. मुंबई-महामुंबई परिसरात सध्या उष्णतेची लाट असून मंगळवारीही उन्हाचा तडाखा कायम राहिलेलाच दिसून आला. उष्णतेचे वाढते प्रमाण पाहता सलग दुसऱ्या आठवड्यात मुंबईत कमाल तापमान 38 अंशांच्या वर पोहोचले.
मार्चमधील 10 दिवसांमध्ये तीन दिवस कमाल तापमानाचा पारा
38 अंशांच्या वर नोंदवला गेला. सोमवारी मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, अकोला, अमरावती येथे उष्णतेच्या लाटेची तर रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना येथे उष्ण आणि दमट वातावरणासाठी यलो अलर्ट देण्यात आला होता. कोकण विभागामध्ये काही ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट जाणवू शकेल, असेही सांगण्यात आले होते. केवळ कमाल तापमानच नाही, तर मुंबईत किमान तापमानाही वाढतेच होते. कुलाबा येथे 24, तर सांताक्रूझ येथे 21.3 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. अलिबाग येथे किमान तापमान सरासरीपेक्षा सहा अंशांनी अधिक आहे.
आग ओकणाऱ्या सूर्यामुळे पाऱ्याने गाठली 42 अंशांपर्यंत मजल
डोंबिवली : उन्हाच्या काहिलीमुळे मनुष्य तथा जलचरांसह वनस्पती आणि प्राणिमात्रांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोकण आणि मुंबई महानगर परिसरात सध्या उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. कल्याण-डोंबिवलीमध्येही तापमानाने चाळीशी ओलांडत थेट 42 अंशांपर्यंत मजल मारल्याने सारेच हैराण झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून यंदाच्या मोसमातील हे उच्चांकी तापमान असल्याची माहिती कोकण पट्ट्यातील हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली. हवामान तज्ज्ञांच्या मते, सद्या प्रतिचक्रवाती हवामान स्थितीचा प्रभाव निर्माण झाल्याने समुद्राकडून मिळणारा थंडावा कमी झाला आहे. त्यामुळे किनारपट्टीपासून थोड्या अंतरावर असलेल्या भागांमध्ये कोरड्या खंडीय उष्णतेचा प्रभाव वाढला असून तापमान झपाट्याने वाढत असल्याचे मोडक यांनी सांगितले.
9 मार्च रोजी कोकणातील कमाल तापमानाच्या नोंदींनुसार किनारपट्टीपासून आतल्या भागातील अनेक ठिकाणी तापमान हे सरासरीपेक्षा 5 ते 7 अंश सेल्सिअसने अधिक नोंदवले गेले. सलग दुसऱ्या दिवशी कोकणच्या अंतर्गत भागात कोरड्या उष्णतेच्या तीव्र लाटेची स्थिती कायम असल्याचेही मोडक यांनी स्पष्ट केले. सामान्यतः कोकण किनारपट्टी भागात दुपारच्या सुमारास समुद्राकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमान काही प्रमाणात नियंत्रणात राहते. मात्र सद्या समुद्री वारा उशिरा सुरू होत असल्याने सकाळपासून दुपारपर्यंत तीव्र उष्णता जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे. भरपूर पाणी पिणे, तसेच उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.
हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार कोकणसह मुंबई महानगर क्षेत्रातील अनेक शहरांमध्ये उष्णतेचा पारा वाढलेला दिसून येत आहे. काही प्रमुख शहरांमधील तापमान पुढीलप्रमाणे नोंदविण्यात आले आहे.
कल्याण-डोंबिवली 42
विक्रमगड 43.5
महाड 43.2
भातसनगर 43
कर्जत 42.7
पलावा 42.6
चिपळूण 42.3
मुंब्रा 42.3
मनोर 42.1
चौक 42.1
खारघर 41.9
तळोजा 41.7
पनवेल 41.6
अंबरनाथ 41.6
कोपरखैरणे 41.5
दिघा 41.5
कांजूरमार्ग 41.4
बदलापूर 41.3
ठाणे 41.2
ऐरोली 41.1
कळवा 41.1
नेरुळ 41
विरार 41
नवी मुंबई विमानतळ परिसर 41
मुलुंड (पूर्व मुंबई) 40.9
पालघर 40.8
वाशी 40.3
उत्तन 40.2
देवनार (दक्षिण-पूर्व मुंबई) 40.1
बोरिवली 39.5
दापोली 39
मुंबई 38.4