

डोंबिवली: डोंबिवली आणि विशेषतः ग्रामीण परिसरात गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. १५ दिवस आधी बुकिंग करूनही गॅस मिळत नसून, बुकिंग रद्द झाल्याचा मेसेजही ग्राहकांना दिला जात नाही.
घरपोच डिलिव्हरी बंदमुळे तासन्तास रांगेत उभे राहणाऱ्या ज्येष्ठांसह गृहिणींची पंचाईत झाली आहे. गॅस सिलिंडर वेळेवर मिळत नसल्याने हजारो कुटुंबे भयंकर त्रस्त झाली आहेत.
घरपोच गॅस सिलिंडर डिलिव्हरी बंद केल्याने ग्राहकांना स्वतः गॅस घेण्यासाठी तासन्तास रांगा लावाव्या लागत आहेत. सध्या कर्मचारी उपलब्ध नसल्याचे कारण एजन्सीकडून दिले जात आहे. एकंदर गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सीची यंत्रणाच कोलमडल्याने कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
डोंबिवलीजवळच्या आजदे, सांगर्ली गावांतील रहिवासी असलेले ग्राहक या गॅस कंपनीच्या सिलिंडरसाठी एमआयडीसी मधील पेट्रोल पंपाजवळील गॅस एजन्सीच्या गोडाऊनवर गर्दी करत आहेत.
तिथे गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिकांना गॅस सिलिंडर मिळण्यासाठी चार-चार तास थांबावे लागत आहे. त्यातच पावती बनविण्यासाठी आधी नेहरू मैदानाजवळील गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये जावे लागते.
त्यानंतर गोडाऊनवर जाऊन सिलिंडर घ्यावा लागतो. यासाठी रिक्षाचा खर्च करावा लागत असून एका ग्राहकाचे किमान १०० रुपये अतिरिक्त खर्च होत आहेत. सर्व ग्राहक मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न गटातील आहेत.
आजदे गावातील योगिता थोटांगे यांचा घरातील गॅस सिलिंडर संपला होता. नोंदणी करूनदेखील गॅस सिलिंडर न आल्याने त्या सकाळी गोडाऊनवर गेल्या असता त्यांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागला.
दरम्यान याबाबत एजन्सीला जाब विचारला असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. आशिष नेवाळकर हा युवक शिक्षणाबरोबर नोकरीही करतो. गॅससाठी त्यालाही कामावरून रजा घेऊन रांगेत उभे राहावे लागले. अनेक ग्राहकांनी या त्रासाबद्दल स्थानिक नगरसेवकांकडे तक्रारी केल्या आहेत.
महानगर गॅस सुरू करण्याची मागणी
गॅसचा काळाबाजार होत असल्याचीही चर्चा आहे. आधीच महागाई आणि गॅस दरवाढीने जनता त्रस्त आहे. त्यात आता वाहतूक खर्च आणि वेळेचा भुर्दंड पडत आहे. याचा सर्वाधिक फटका गृहिणींना बसत आहे.
संबंधित सरकारी प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन कडक कारवाई करावी. तसेच आजदे, सांगर्ली सारख्या ग्रामीण भागात महानगर गॅस पुरवठा सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी त्रस्त गृहिणींनी मागणी केली आहे.