डोंबिवली: जादा भाड्याबाबत विचारल्याने रिक्षा चालकाची प्रवासाला मारहाण | पुढारी

डोंबिवली: जादा भाड्याबाबत विचारल्याने रिक्षा चालकाची प्रवासाला मारहाण

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : डोंबिवलीत रिक्षा चालकांची दादागिरी वाढली असून रिक्षाच्या जादा भाड्याबाबत विचारले असता रिक्षाचालकाने प्रवाशाला बांबूने मारल्याची घटना डोंबिवली येथील इंदिरा चौकात घडली. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली असून सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

डोंबिवली हे चाकरमान्यांचे शहर आहे. त्यामुळे येथे कायमच रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर चाकरमानी घरी जाण्यासाठी रिक्षाचा वापर करतात. प्रवासी गणेश तांबे हे सोमवारी रात्री अकरा वाजता आपल्या घराकडे जात होते. कल्याणला राहणाऱ्या गणेश तांबे यांनी इंदिरा चौकात जाऊन टाटा पॉवरपर्यंत शेअर रिक्षाने जाण्याचे ठरविले. त्यानंतर भाडे किती घेणार, असा प्रश्न रिक्षा चालकाला त्यांनी विचारला. यावेळी रिक्षा चालकाने वाढवून भाडे सांगितले. यावर तांबे यांनी इतके भाडे होत नाही, असे रिक्षा चालकाला सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर संतप्त झालेल्या रिक्षा चालकाने त्यांना रिक्षातील बांबू काढून मारहाण केली. यात तांबे जखमी झाले. त्यांच्यावर शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, याआधी देखील अनेक महिलांनी यासंदर्भात तक्रार देखील केली आहे. इतकेच नव्हे, तर, महिलांना देखील रिक्षा चालकांनी धक्काबुक्की केल्याची घटना घडल्या आहेत. मात्र, वाहतूक पोलिस आणि आरटीओचे कोणतेही नियंत्रण रिक्षा चालकांवर नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button