जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर, कार्यकर्त्यांचा जल्लोष | पुढारी

जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर, कार्यकर्त्यांचा जल्लोष

ठाणे : पुढारी वृत्तसेवा; विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटी-शर्थींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, ठाणे न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आव्हाड यांना काल शुक्रवारी अटक करण्यात आली होती. आव्हाड यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि तपासात सहकार्य करण्याचा अटीवर आव्हाड यांच्यासह १२ जणांना जामीन मंजूर झाला आहे. दरम्यान, ठाण्याच्या वर्तकनगर पोलीस ठाण्यासमोर आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करुन जल्लोष केला. आव्हाड यांनी ‘जामीन मिळाला’ असे स्वतः ट्विट करत म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड यांना ठाणे न्यायालयात हजर केल्यानंतर सकाळी 11 वाजता सुरुवात झाली होती. यावेळी आव्हाड यांचे वकील ॲड प्रशांत कदम यांनी आव्हाड यांची अटक कशी बेकायदेशीर आहे यावर युक्तिवाद केला. आव्हाड आणि इतर लोकांवर दाखल केलेले गुन्हे चुकीचे असून हे गुन्हे जाणीवपूर्वक दाखल करण्यात आले असल्याचे कदम यांनी सांगितले. आव्हाड यांना जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा जामीनपात्र कलम लावण्यात आले होते. मात्र त्यानंतर यामध्ये सेक्शन 7 हे कलम जाणीवपूर्वक लावण्यात आले. हे कलम ठाणे शहरात लागू करू शकत नसल्याचे सांगत तशी तरतूद 1932 साली करण्यात आली आहे असा दावा ॲड प्रशांत कदम यांनी न्यायालयात केला. दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी देखील स्वतःहून चौकशी करता पोलीस ठाण्यात हजर झाल्याचे सांगत तपासाला पूर्ण सहकार्य केले असल्याचे कदम यांनी न्यायालयात सांगितले. ही अटक पुर्णपणे बेकायदेशीर असल्याचा दावाही ॲड कदम यांनी न्यायालयात केला.

आव्हाडांना जेव्हा ताब्यात घेण्यात आले त्यावेळी आयपीसी 141,143,146,149,323,504, महाराष्ट्र पोलीस कायद्यातील 37(3), 135 हे कलम लावण्यात आले होते. त्यानंतर यामध्ये कलम 7 वाढवून त्यांना तसेच त्यांच्या सोबत 11 जणांना अटक करण्यात आली. पोलिसांची बाजू मांडताना सरकारी वकील ॲड. अनिल नंदगिरी यांनी आव्हाड यांच्याविरोधात पोलिसांकडे पुरावे असून त्यामुळे त्यांच्या कस्टडीची मागणी त्यांनी यावेळी नायायालयात केली. या प्रकरणावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर हा निकाल एक तास निकाल राखून ठेवण्यात आला. त्यानंतर आव्हाड यांना पुन्हा वर्तक नगर पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आले. यावेळीही वर्तक नगर पोलीस ठाण्याच्या बाहेरही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

जितेंद्र आव्हाड यांना सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबवस्त ठेवण्यात आला होता. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील मोठी गर्दी करत घोषणाबाजी देखील केली. खवबरदारीचा उपाय म्हणून कोर्ट नाक्याकडे येणारे दोन्ही मार्ग पोलिसांनी बंद केले होते. सुनावणी झाल्यानंतर आव्हाडांना न्यायालयाच्या बाहेर आणण्यात आले तेव्हा कार्यकत्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली.

काय आहे प्रकरण?

सोमवारी 7 नोव्हेंबर रोजी रात्री 10 च्या सुमारास ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाचा शो सुरू होता. या चित्रपटामध्ये शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्याविषयीच्या इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप करत जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी शो बंद पाडला. यावेळी काही प्रेक्षकांना आव्हाडांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. मनसेनं यासंदर्भात टीका केल्यानंतर आव्हाडांविरोधात वर्तकनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी त्यांना अटक करण्यात आली.

जेलची भीती काय दाखवता, फासी द्या, ठाण्यात आव्हाडांची बॅनरबाजी

आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आल्यानंतर ठाण्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे. यामध्ये जेलची भीती काय दाखवता फासी द्या असे आव्हान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बॅनरच्या माध्यमातून दिले आहे. इतिहासाचे विकृतीकरण सहन करणार नसल्याचे या बॅनरमध्ये नमूद करण्यात आले आहे. ठाण्यात लावण्यात आलेला हा बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

हे ही वाचा :

Back to top button