ब्रेकिंग न्यूज : उजनी डावा कालवा फूटला; शेतीचे प्रचंड नुकसान; द्राक्ष, डाळिंब, ऊस आणि इतर पिके गेली वाहून | पुढारी

ब्रेकिंग न्यूज : उजनी डावा कालवा फूटला; शेतीचे प्रचंड नुकसान; द्राक्ष, डाळिंब, ऊस आणि इतर पिके गेली वाहून

टाकळी सिंकदर; पुढारी वृत्तसेवा : उजनी पाटबंधारे विभागाचा डावा कालवा पाटकुल (ता. मोहोळ) येथे आज (दि.२९) सकाळी फुटला. यामध्ये काढणीला आलेल्या द्राक्ष बागांसह ऊस शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. शेकडो एकर शेतीमध्ये पाणी साचले असून कालव्याजवळ राहणाऱ्या वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. अद्यापही पाण्याचा प्रवाह सुरू असून झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

उजनी धरणातून उजव्या कालव्यामध्ये ५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु होता. आज सकाळी पाटकुल गावात गंगाधर सातपुते वस्ती नजीक हा कालवा फुटल्याने शेतात पाणी शिरून पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचा पाटकुल येथील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. पाटकुल ओढ्याजवळ कालवा फुटल्याने पिकांसह विहिरींचे देखील मोठं नुकसान झाले आहे. परिसरातील शेकडो एकर शेतीचे क्षेत्र पाण्याखाली गेले आहे.

काढणीला आलेल्या द्राक्ष बागांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. कालव्यातील व शेतकऱ्यांच्या विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटारी वाहून गेल्या आहेत. अद्यापही पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात सुरू आहे. झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे. शिवाय प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी केली आहे.

Back to top button