सोलापूर : भाजपने देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी केली : खा. सुप्रिया सुळे | पुढारी

सोलापूर : भाजपने देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी केली : खा. सुप्रिया सुळे

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : देशाची अर्थव्यवस्था झपाट्याने ढासळत आहे. त्याचे विपरित परिणाम देशाच्या विकासावर आणि अर्थव्यवस्थेवर होणार आहेत. महागाई आणि बेरोजगारीने कळस गाठला असतानाही भाजप सरकार यावर गंभीर नसल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. जर यावर शासनाने गांभीर्याने वेळीच विचार केला नाही तर देश आर्थिक दिवाळखोरीत निघेल अशी खंतही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

खासदार सुप्रिया सुळे या आज (शुक्रवार) सोलापूर दौर्‍यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार यशवंत माने, जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, महिला अध्यक्षा सुवर्णा रणसुरे, प्रवक्ते उमेश पाटील, भारत जाधव, महेश गादेकर आदी उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाजप हा पक्ष पक्ष राहिला नाही तर लाँड्रीचे काम करित असल्याचा आरोप त्यांनी केला.

विरोधी पक्षातील लोकांना ईडीच्या नोटीसी देवून त्यांच्यावर कारवाईचा झपाटा भाजपने सुरु केला आहे. तर इतर 5 टक्के लोकांना ही ईडीच्या नोटीसा दिलेल्या नाहीत. त्यामुळे भाजप देशात आणि महाराष्ट्र राज्यात सुडबुद्धीने कारवाया करित असल्याचा आरोप सुळे यांनी केला.

भाजपाने आतापर्यंत केवळ घोषणाच केल्या आहेत. त्याची दहा टक्के ही अमंलबजावणी झालेली नाही. सध्या शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार, व्यवसायिक मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यांच्यासाठी आपण सत्ता नसल्याने काही करु शकत नाही याची खंत वाटत असल्याचे सुळे यांनी कबुल केले. सध्या भाजपाने मिशन बारामती लोकसभा राबविले असून, बारामती लोकसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपने व्युहरचना सुरु केली आहे. लोकशाहीमध्ये सर्व निर्णय जनमतावर ठरतात. त्यामुळे बारामतीत येणार्‍या लोकांचे अतिथि देवो भव या प्रमाणे आपण त्यांचे स्वागतच करतो असे सांगत त्या ठिकाणी कोणीही येवून निवडणूक लढवू शकतात. मात्र निर्णय मतपेटीतून जनता घेणार आहे. त्याची भिती आम्हाला वाटत नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

बारामतीसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात विकासाची गंगा राबविली आहे. त्यामुळे गेल्या पाच सहा वर्षात भाजप सरकारने काय साध्य केले असा सावल ही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. स्मार्ट सिटीच्या नावाखाली जवळपास देशभरात 1 लाख कोटी रुपये खर्च केले असले तरी देशातील कोणतीच सिटी स्मार्ट झालेली नाही याची खंत वाटत असल्याचे सुळे यावेळी म्हणाल्या. यावेळी शहराध्यक्षा सुनिता रोटे, कविता म्हेत्रे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

आता निवडणुका घेतल्यास भाजपला पराभवाची भीती 

सध्या राज्यातील जिल्हा परिषद आणि नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणुका घेतल्या तर या निवडणुकीत भाजपचा दारुन पराभव होईल याची भीती केंद्र आणि राज्यसरकारला वाटत आहे. त्यामुळेच निवडणूका पुढे ढकलल्या जात असल्याचे खा. सुळे यांनी सांगितले. तसेच देशात खासगी संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपचे निम्मे उमेदवार निवडून येवू शकत नाहीत. त्यामुळे येणार्‍या निवडणूकांना आता भाजपा घाबरत असल्याचा आरोप सुळे यांनी केला आहे.

हेही वाचा :  

Back to top button