सातारा : पुढारी वृत्तसेवा : ईपीएस पेन्शनधारकांना वाढीव पेन्शन मार्च अखेरपर्यंत द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा ईपीएस पेन्शन धारक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी दिला.
सातारा जिल्ह्यातील ईपीएस पेन्शन धारकांचा मेळावा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गृहात पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना अशोक राऊत म्हणाले, भारतात ईपीएस पेन्शन धारकांची संख्या सुमारे 70 लाख असून त्यांना एक हजार रुपये एवढ्या तुटपुंज्या मानधनावर आयुष्याच्या सायंकाळी काळ कंठावा लागत आहे. जीवनाची उर्वरीत आयुष्य स्वाभिमानाने जगता यावे, यासाठी त्यांना वाढीव पेन्शन लवकरात लवकर सुरु करावी, अशी मागणी आहे.
त्यासाठी केंद्राच्या अर्थ, कामगार विभागांच्या सचिवांशी ईपीएस आयुक्तांसह चर्चा केली. तसेच संसद सदस्या हेमामालीनीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करुन पेन्शन वाढीची सहमती मिळवली आहे. प्रत्यक्ष पेन्शवाढ मार्च अखेर करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राऊत यांनी दिला आहे.
यावेळी भुजंगराव जाधव, संघटनेचे पश्चिम भारताचे सचिव सुभाष पोखरकर, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा शोभा आरस, पश्चिम भारत महिला आघाडीच्या संघटक सौ. सरिता नारखेडे व रवी साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन सचिन जगताप यांनी केले. स्वागत शामराव खटावकर व प्रदिप शिंदे यांनी केले. शहाजी माने यांनी आभार मानले.
हेही वाचलंत का?