माण-खटावचे विकासक : अनिल देसाई | पुढारी

माण-खटावचे विकासक : अनिल देसाई

कर्तृत्वाच्या जोरावर यशाचे शिखर गाठूनही मातीशी असलेली नाळ जपणारे कर्तृत्वसंपन्न नेतृत्व, दिलदार व्यक्तिमत्व आणि माण, खटावचे विकासक मा. अनिलभाऊ देसाई यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मन मोठं असेल तर निश्‍चितच नाव मोठं होतं. अनिलभाऊ देसाई यांनीही आपल्या दिलदार वृत्तीतून समाजाप्रती असलेली निष्ठा दाखविली असून त्यांच्या या उदारमतवादी भुमिकेमुळे जनमाणसात त्यांचे नाव आदराने आणि अभिमानाने घेतले जाते.

स्वत:ला एका साचात न ठेवता समाजकारण, राजकारणासह प्रत्येक क्षेत्रात त्यांनी स्वत:चे वलय निर्माण केले आहे. त्यामुळे आज ते जनसामान्यांचे नेते झाले आहेत. माण, खटावमध्ये विकासगंगा पोहोचविण्याबरोबरच जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये दोन वेळा बिनविरोध व सलग वीस वर्षे संचालक तसेच दोन वेळा उपाध्यक्ष या पदाच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटणार्‍या मा. अनिलभाऊ देसाई यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला हा आढावा…

नेता म्हटला की राजकीय पक्षातील आजच्या नेत्यांची प्रतिमा चटकन डोळ्यासमोर येते. पद, पैसा व प्रसिद्धीसाठी वाटेल ते करणारे, नियम व कायदा मोडून दादागिरी करणारे, इतरांच्या कामाचे श्रेय आपणाकडे ओढून घेऊन इतरांचा वापर करुन घेणारे पहावयास मिळतात. नेतेगिरी हा आजकाल बिनभांडवली फायदेशीर धंदा पण झाला मात्र, या सगळ्याला अनिल देसाई यांनी फाटा देत समाजकारणाच्या माध्यमातून विकासाचा ध्यास हाती घेतला.

माण तालुका दुष्काळात होरपळत होता त्यावेळीही युद्धपातळीवरुन त्यांनी अधिकतर रोजगार हमीची कामे, शेतकर्‍यांच्या जनावरांसाठी छावणीच्या माध्यमातून खूप वेगळ्या पद्धतीने काम केले आहे. या माणमधील प्रमुख 16 गावांना पाणी मिळवून देण्यासाठी 2003 पासून अनेक संघर्ष, आंदोलने झाली. अनिल देसाई यांनी सलग पंधरा वर्षे पाण्यासाठी अखंड लढा दिला.

यासाठी दहिवडी येथील तहसील कार्यालयसमोर 16 गावांना बरोबर घेऊन 16 दिवस ठिय्या आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, कृष्णा खोरेच्या पुणे येथील कार्यालसमोर व मुंबईच्या आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन केले. या संघर्षात अबाल वृध्दांसह महिला व शेतकरी जनावरांसह ते सहभागी झाले. आघाडी सरकारला आंदोलने, मोर्चे यांच्या माध्यमातून जागे करण्याचा प्रयत्न केला. सरकारकडून पाण्याचा प्रश्न मिटवण्याचा विडा उचलला. राजकारणापेक्षा समाजाकारण महत्वाच्या माणणार्‍या अनिल देसाई यांनी पक्षाला कोणत्याही पदाची मागणी न करता जनतेसाठी पाण्यासाठी मागणी केली, ही बाब सर्वांच्याच मनाला भावणारी होती.

मला कोणतही पद नको पण माझा माण पाण्याच्या टंचाईतून मुक्त करा, अशी आर्त साद घालणार्‍या अनिल देसाई यांचे माणचा शेतकरी खर्‍या अर्थाने बळीराजा झाला पाहिजे, हे अनिल देसाई यांच स्वप्न होते. त्यासाठीच अनेक वर्षांचा हा पाण्याचा लढा यशस्वी करत टेंभू योजनेतून माण तालुक्यातील शिवारात पाणी आणले. तत्कालीन सरकारनं दोन वर्षात या सोळा गावांच्या पाणी प्रश्‍नासाठी 4 कोटी 32 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध केला. जे पंधरा वर्षात घडलं नाही ते अनिल देसाई यांनी दोन वर्षात करून दाखवलं अन् माणमध्ये हरितक्रांती घडण्याचा मार्ग मोकळा झाला. सहकाराचा विचार निरोगीपणाने राबवला तरच समाजजीवन होऊ समृद्ध शकते.

ग्रामीण भागातील गरीब शेतकरी व शेतमजूर यांचे दैन्य दूर करण्यासाठी सहकार हाच एकमेव पर्याय आहे, ओळखूनच जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांचे कार्य सुरु आहे. यामुळेच जिल्हा बँकेच्या संचालकपदी सलग चारवेळा निवडून येवून तर दुसर्‍यावेळेस उपाध्यक्ष पदाची संधी त्यांना मिळाली असून माण-खटावच्या जनतेला जिल्हा बँकेत आपला हक्काचा माणूस असल्याची नेहमीच भावना राहिल. कोवीड साथीतही माणमधील रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत म्हणून आम्ही म्हसवड कोवीड केंद्राला लागेल ती मदत करण्यात अनिल देसाई कुठेही कमी पडले नाहीत. ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागल्याने या केंद्रात 5 मोठे जंबो सिलेंडर, 2 मिनि व्हेंटीलेटर, 25 ऑक्जिजन कॉन्सन्ट्रेटर, जिल्हा परिषदेच्या माध्यमतून सुमारे 25 लाखांची औषधे उपलब्ध करुन दिली.

अशा जीवघेण्या साथीतही जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा, वैद्यकीय यंत्रसामुग्री देण्याबरोबरच जनतेला मानसिक आधार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्यामुळेच माण-खटाववासियांबरोबरची जवळीक आणखी वृद्धिंगत झाली आहे. माण-खटाव तालुक्याच्या विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी आपले उभे आयुष्य पणाला लावणार्‍या, समाजाची नाडी ओळखणार्‍या सहृदय नेत्याकडून आणखी समाजसेवा घडावी, यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभो, हीच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा..!
– जालिंदर खरात,
वरकुटे-मलवडी

हेही वाचलंत का? 

Back to top button