सातारा : पुढारी वृत्तसेवा : mp udayan raje satara : कण्हेर उद्भव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना चांगली असूनही श्रेयवादामधून बासनात गुंडाळली गेली. त्यामुळे नागरिक मात्र या योजनेच्या पाण्यापासून सुमारे 20 वर्षे वंचित राहिले, याची खंत आहे.
तथापि 'देर है लेकिन अंधेर नही' याचे समाधान आहे, अशी भावना साविआचे अध्यक्ष आणि खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी 'पुरा काम तो किसीने रोका, मगर, आधेने तो पुरा काम किया है' असा डायलॉगही त्यांनी मारला.
शाहूपुरी 27 बाय 7 या योजनेच्या पाणीपुरवठ्याची यंत्रणा कळ दाबून कार्यान्वित केल्यानंतर खा. उदयनराजे भोसले प्रसार माध्यमांशी अनौपचारिक बोलत होते. यावेळी सातारा पंचायत समितीचे माजी सदस्य संजय पाटील, अॅड. डी. जी. बनकर, नगरसेवक वसंत लेवे, बाळासाहेब ढेकणे, अमित कुलकर्णी, राजेंद्र गिरिगोसावी, कार्यकारी अभियंता पल्लवी चौगुले, सतीश अग्रवाल, तत्कालीन शाहूपुरी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
खा. उदयनराजे भोसले यांनी सांगितले की, आमच्या महसूल राज्यमंत्री पदाच्या काळात तत्कालिन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कण्हेर उद्भव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे भुमिपूजन झाले होते.
दरम्यान सत्तापालट झाला अन् श्रेयवादातून योजना रखडली. ती मार्गी लागली असती तर केवळ 16 कोटी रुपये अंदाजपत्रकीय रकमेमध्ये शाहूपुरी, शिवराज पेट्रोलपंपाच्या पूर्वेकडील वसाहतींसह योजनेतील मार्गावरील एकूण 18 गावातील 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येला
ग्रॅव्हिटीने पाणी पुरवठा उपलब्ध झाला असता. 1999 नंतर सत्ताबदल झाला.
आम्ही आमदार म्हणून राहिलो नाही. अनेक विनंत्या-आर्जव करुनही केवळ आम्हाला श्रेय मिळेल या संकुचित हेतूने एक चांगली पाण्याची सुविधा देणारी योजना अडगळीत टाकण्यात आली, पुढे मृतवत झाली.
आजच्या शाहुपूरी 24 बाय 7 योजनेमधून शाहूपुरी आणि काहीसा करंजेमधील सुमारे 10 हजारपेक्षा जास्त लोकसंख्येच्या भागाकरता प्रथम 31 कोटी आणि नंतर वाढील अंदाजपत्रकानुसार सुमारे 42 कोटी रुपये मोजावे लागले आहेत.
निव्वळ श्रेयवादामुळे हे झालेले सार्वजनिक पैशाचे दुहेरी नुकसान कुणी काहीही म्हटले तरी निश्चितच कधीही भरुन न येणारे आहे.
श्रेयवादाची मानसिकता कुणाचीही असू नये. नागरिकांना मिळणा-या मुलभुत सुविधा केंद्रबिंदू ठेवल्या पाहिजेत. आपणाला जमलं तर जरुर करावे. परंतु दुसरा काही करत असेल तर त्याला एक तर सहाय्य नाही जमले तरी खोडा तरी घालू नये.
श्रेयवाद ही संकुचित मानसिकता आहे. स्व. दादामहाराज ऊर्फ श्री. छ. प्रतापसिंह महाराज यांचा पायंडा मार्गदर्शक आहे. आज निदान कण्हेरमधून शाहूपुरीकरांना तरी पाणी आणले आहे. या 24 बाय 7 योजनेमधून सुमारे 10 हजार पाणी कनेक्शन्स नगरपरिषदेच्या माध्यमातून दिली जातील. 18 गावांची नाही तरी शाहूपुरीकरांची तरी तहान भागवण्याचा निश्चितच आनंद आहे. 'पुरा काम तो किसीने रोका, मगर, आधेने तो पुरा काम किया है' असा डायलॉगही खा. उदयनराजेंनी मारला.