सातारा : मंत्र्यांची अटक ही त्यांच्या कर्माची फळं : खा. उदयनराजे
सातारा : पुढारी वृत्तसेवा
मंत्र्यांना झालेली अटक ही त्यांच्या कर्माची फळे आहेत. त्यात राजकारण नाही. त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची ही परतफेड आहे, अशा शब्दात राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. सातार्यात गांधी मैदानावर आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांनी विविध प्रश्नांवर खा. उदयनराजेंना बोलते केले. खा. उदयनराजे म्हणाले, रशिया व युक्रेन यांच्या युद्धाचा भारताला फटका बसू नये. वेळीच त्यात लक्ष घातले पाहिजे. जे भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत त्यांनाही तातडीने मदत झाली पाहिजे.
राज्यात मंत्र्यांना अटक होत आहे, याकडे तुम्ही कसे पाहता? असे विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले, ती त्यांच्या कर्माची फळे आहेत. त्यांनी गुन्हा केला असेल त्याची परतफेड करावीच लागेल. कायद्याने सर्व काही होत आहे. यामध्ये काही राजकारण नाही. सर्वसामान्यांना एक न्याय आणि या सगळ्यांना एक न्याय असे होत नाही.
खा. छत्रपती संभाजीराजे हे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर उपोषणाला बसणार आहेत. यावर खा. उदयनराजेंना छेडले असता मी त्यावर आता काय बोलणार? आरक्षणाच्या विषयाची आता चव गेली आहे. किती गोष्टी होवून गेल्या आहेत, असे उदयनराजे म्हणाले.
शालेय शिक्षणात मावळ्यांचा समावेश केला पाहिजे. त्याविषयीची अधिक माहिती देवून त्यासाठी आर्थिक तरतूद केली पाहिजे, असेही खा. उदयनराजे म्हणाले.